पालिकेकडून संवर्धनावर भर : बनतोय सेल्फी पॉईंट
आळंदी – सिद्धबेटामध्ये प्रवेशद्वाराजवळील परिसरात विविध प्रकारचे वृक्षारोपण विविध संस्था,व्यक्ती व पालिका प्रशासन मार्फत करण्यात आले आहे.
तेथील वृक्षांची योग्य प्रकारे वाढ व्हावी यासाठी वृक्ष वाढीसाठी अपायकारक असलेल्या वेलीचा नायनाट करण्यात आला असून, छोटे मोठे गवत काढून तिथे स्वच्छता करण्यात आली आहे.तर या वृक्ष संवर्धनासाठी सेंद्रीय खतांचा वापर केला जात असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.
तेथील झाडांना पालिका प्रशासनामार्फत सेंद्रीय खतांसोबतच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रासायनीक खतापेक्षा सेंद्रीय खताचा वापर केला जात आहे. सेंद्रीय पदार्थ आणि खते जमिनीचा पोत सुधारतात, ज्यामुळे ते पाणी जास्त काळ टिकून राहते आणि जमिनीत जिवाणू आणि बुरशीजन्य क्रियाकलाप वाढवतात. म्हणून, ते केवळ आपल्या झाडांनाच मदत करत नाहीत तर ते मातीला मदत करतात. दुसरीकडे, कृत्रिम खते मातीतील पोषक तत्वे कमी करतात, ज्यामुळे ती अनुत्पादक बनते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
सिद्धबेट प्रवेशद्वार जवळील केलेल्या वृक्षारोपणामुळे तेथील परिसर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.पालिका प्रशासनाने तेथील वृक्ष संवर्धनासाठी व स्वच्छतेसाठी विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.यासाठी पालिकेच्या कर्मचार्यांसह विविध व्यक्ती व संस्थाचे सहकार्य तिथे लाभत आहे.सद्यस्थितीत या परिसरात अनेक जण छायाचित्रे काढण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहेत.