नगर -स्पर्धेत सहभाग महत्त्वाचा आहे. यशअपयश पचवण्याची ताकद अंगी बाणवा. एक हरल्याशिवाय दुसरा जिंकत नाही. सर्वांनी कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. स्पर्धेदरम्यान टीम वर्क दिसून आले. सांघिक भावनेने काम करा, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी महावीर सिंग चौहान म्हणाले.
कृषी विभाग ‘कृषी जल्लोष २०२३-२४’ अंतर्गत आयोजित दोन दिवशीय जिल्हास्तरीय कला व क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला. या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विलास नलगे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. या वेळी प्रशासकीय अधिकारी (लातूर) अशोक गिरवले, लेखाधिकारी श्रीकांत देवडीकर, कृषी उपसंचालक किरण मोरे, विलास गायकवाड, अमोल काळे, कृषी सहाय्यक संघटनेचे राज्य सरचिटणीस सोमनाथ बाचकर, गजानन घुले, बापू शिंदे, दीपक सुपेकर, आबासाहेब मोरे, धनंजय हिरवे, अंकुश टकले, सिद्धार्थ क्षीरसागर, सुधीर शिंदे, मनोज सोनवणे यांच्यासह कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सुधाकर बोराळे म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी गुणवत्तापूर्वक खेळ केला. तणाव मुक्तीसाठी स्पर्धा घेण्यात आली. अधिकारी व कर्मचारी ही भावना विसरून सर्वजण एकत्र येऊन खेळले. येथे फक्त खेळाडू व कलाकार ही भावना होती. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शेतकरी योजना उत्कृष्टरित्या राबविल्याने जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर आघाडीवर आहे, असे ते म्हणाले.