जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील आदिवासी गावे जोडली जाणार
जुन्नर – गेल्या 50 वर्षांपासून रखडलेल्या कावळखिंड मार्गाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील शेवटचे टोक असलेले तांबे गाव आणि शेजारील आंबेगाव तालुक्यातील वरसावणे यांना जोडणाऱ्या खिंडीच्या रस्त्याचे काम 1972 च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सुरू झाले होते. मात्र, तेव्हापासून रखडलेल्या या मार्गासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून (टप्पा-2) तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी दिली.
बोरघर (ता. आंबेगाव) पासून वरसावणेपर्यंत रस्ता आहे, मात्र तेथून पुढे रस्ताच नाही. आता मार्गामुळे दोन्ही तालुक्यातील आदिवासी बांधवांना मोठा लाभ होणार असून या भागांतील रानमेवा, शेतीमाल यांना बाजारपेठांचे अंतर कमी होणार आहे. तसेच भविष्यात या मार्गाचे डांबरीकरण होऊन स्थानिकांना पर्यटनाच्या, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
हा रस्ता होण्यासाठी तांबे ग्रामस्थ आग्रही होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे, युवा नेते ऍड. ललित जोशी, किरण लोहकरे, बेलसरचे उपसरपंच रोशन मंडलिक, सरपंच मीरा मडके, उपसरपंच चंद्रकांत पारधी, कविता मडके, मिलिंद मडके आदी उपस्थित होते.
20 मोऱ्या होणार
वरसावणे ते तांबे हा 5.7 किलोमीटर अंतराचा मार्ग नव्याने तयार होणार आहे. या डोंगरदऱ्या असलेल्या भागातून रस्ता बनवताना विविध ठिकाणी भराई, खोदकाम तसेच सुमारे 20 मोऱ्यांची कामे होणार आहेत. या मार्गाला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला असून सध्या या निधीतून केवळ मातीकाम होणार आहे.