पुरंदरमधील पहिले गाव ठरले : विकासासाठी मतभेद ठेवले बाजूला
वाल्हे – आडाचीवाडी (ता.पुरंदर) येथील ग्रामस्थांनी राजकीय जोडे बाजूला सारून विकासकामांना कौल देत, गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून सर्वच राजकीय नेत्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. दरम्यान, आडाचीवाडीकरांनी विकासकामांना कौल देत सर्वच उमेदवार “बिनविरोध’ निवडून दिल्याने आडाचीवाडी हे बिनविरोध होणारे “पुरंदर’ तालुक्यामध्ये पहिले गाव ठरले आहे.
मागील पाच वर्षांपूर्वी वाल्हे ग्रामपंचायतीतून विभक्त होत आडाचीवाडी ग्रामपंचायतीचा उदय झाला होता. दरम्यान, मागील काळात, आडाचीवाडी ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ व संदेश शिर्के यांनी विविध फंड गावात आणून आडाचीवाडी गाव पुरंदर तालुक्यात आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न केले असून भविष्यात अशीच विविध विकासकामे पूर्ण होऊन गावचा तसेच ग्रामस्थांचा विकास होईल या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी येथील रहिवासी व रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्केच यांना उद्योजक विक्रम पवार, वाल्हे गावचे माजी उपसरपंच सूर्यकांत पवार, आडाचीवाडी माजी सरपंच दत्तात्रेय पवार आदी प्रतिष्ठीत गाव पुढाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
बिनविरोध पदाधिकारी
सरपंच : सुवर्णा बजरंग पवार, सदस्य : शकुंतला महादेव पवार, अलका दिलीप पवार, विद्या मच्छिंद्र पवार, प्रतिभा राहुल पवार, सुजाता विजय पवार, लता बाळासाहेब पवार, मोहन निवृत्ती पवार, विकास अशोक पवार, ज्ञानदेव भाऊसाहेब पवार.