श्रीगोंदा – संभाजी ब्रिगेडने आरक्षणाचा मुद्दा सोडलेला नाही. 1 जून 2004 च्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते, असा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला.
येथील तुळशीदास लॉन्स येथे संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, 102 व्या घटनादुरुस्तीने आलेल्या खुल्या वर्गातील 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या सवलतीचा लाभ मराठा समाजाला मिळू शकतो. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येच्या मार्गाला न जाता या पर्यायांचा विचार करावा. आरक्षणाने सर्व प्रश्न सुटणार नसल्याने तरुणांचे आर्थिक सक्षमीकरण करणे देखील तितकेच गरजेचे आहे.
यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, प्रदेश संघटक अजयसिंह सावंत, प्रदिप कणसे, सचिन सावंत देसाई, श्याम पाटील, नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र दातीर, शेतकरी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संग्राम देशमुख, कोकण विभाग अध्यक्ष सुभाष सावंत, गोरख दळवी आदी उपस्थित होते. येथील प्रगतिशील शेतकरी अरविंद कापसे यांची संघटनेच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष सुनील ढवळे यांनी प्रास्ताविक केले.