जेजुरीत शेतकऱ्यांचा जनआक्रोश
जवळार्जुन – राज्याचे मुख्यमंत्री आपल्या अभियानाला पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून सुरूवात करणार आहेत. त्यांनी माझ्याबाबतीत गांभीर्याने दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी कांद्याची निर्यात बंदी उठविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडण्याची गरज आहे, गाई- म्हशींच्या दुधाला सरसकट दरवाढ द्यावी, शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज देण्याची मागणी केली, असे त्यांनी केले तर मी स्वतः शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचे स्वागत करेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
महाविकास आघाडीच्या वतीने महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यात शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
जेजुरी शहरातील मोरगाव रोडवर जेजुरी शहर आणि पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे स्वागत केले. पुढे जेजुरी नगरपालिकासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातून मोर्चा काढण्यात आला. डॉ. कोल्हे यांनी जेजुरी गडाच्या पायथ्याशी जावून कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेतले. जेजुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. कोल्हे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कांद्याची निर्यात बंदी उठवावी, शेतकऱ्यांच्या दुधाला सरसकट दरवाढ व्हावी. मोदी सरकारचा विकासाचा रथ जेथे जेथे जातो तेथे शेतकरी दंडुके घेवून हा रथ पळवून लावत आहेत. आमच्या शेतकरी आक्रोश रथाचे सर्वत्र मोठ्या संख्येनं स्वागत होत आहे.
शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार संजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, दत्ता चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, हेमंतकुमार माहूरकर,
जेजुरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एन. डी. जगताप, जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, रवींद्र जोशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमन, सुनीता कोलते, सचिन सोनवणे, हेमंत सोनवणे, अजिंक्य देशमुख, ईश्वर दरेकर, बंडूकाका जगताप, रोहिदास कुदळे, राहुल घाडगे, बाळासाहेब भिंताडे, रावसाहेब पवार, शिवसेनेचे अभिजित जगताप, किरण दावलकर, नागरीक मोठ्या संख्येने महाआघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.