वाई – विद्यार्थी औद्योगिकदृष्ट्या तयार असणे, ही काळाची गरज आहे. फार्मा इंडस्ट्रीमध्ये आपला देश जगात आघाडीवर आहे. यामुळे इंडस्ट्रीला आवश्यक असलेली कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत, असे मत सातारा येथील इन्स्टा व्हिजनचे संस्थापक डॉ. अजित एकल यांनी व्यक्त केले.
वाईतील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे नुकत्याच झालेल्या ‘रासायनिक विश्लेषणात्मक साधन पद्धती’ यावरील एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे अध्यक्षस्थानी होते. विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे, अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक भीमराव पटकुरे, प्रा. उत्तम कांबळे उपस्थित होते.
सध्या बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. रसायनशास्त्राची पदवी घेऊन कौशल्ये वाढवल्यास रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतील, असे डॉ. एकल म्हणाले. वेगवेगळ्या रासायनिक साधन पद्धतींविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. केमिकल कंपन्यांमध्ये आवश्यक असणारी कौशल्ये व उपकरणांबद्दलही माहिती दिली. विद्यार्थ्यांमधील नकारात्मक दृष्टिकोन कसा कमी करता येईल. संकुचित वृत्ती न बाळगता स्वतःला प्रोत्साहित कसे करता येईल, यावर प्रकाश टाकला. डॉ. फगरे म्हणाले, आपली क्षमता ओळखल्यास, तरुण वर्ग आपल्या बुद्धीच्या जोरावर जगाला प्रभावित करु शकतो. पुस्तकी ज्ञान व्यवहारात वापरता आले पाहिजे.
नवीन विषयांचे अध्ययन करताना प्रश्न पडले पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासात अग्रेसर असले, तरी संवाद कौशल्यात मागे राहातात. त्यांनी ही कौशल्ये आत्मसात करावीत. प्रा. डॉ. झांबरे यांनी प्रस्ताविक केले. सौ. मंजिरी पिसाळ यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. निकिता सुर्वे, राजेश्री कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. पूजा भोसले यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी दीपाली पाटील, पूजा जायगुडे, ऋतुजा भोईटे, अक्षदा संकपाळ, अमोल धनावडे, भास्कर घोणे, अनिल सांवत, अनिल शेलार, अनिल लाखे, अनिल बोडरे, चेतन तावरे, किशोर पिसाळ यांनी परिश्रम घेतले.