विविध गावांतील तलाठी, ग्रामसेवक कार्यालयांची दुरवस्था
महसुली कामांसाठी गाठावे लागते जुन्नर
जुन्नर – तालुक्याच्या पश्चिम आदिवासी दुर्गम भागातील विविध गावांमध्ये तलाठी तसेच ग्रामपंचायत कार्यालयांची दुर्दशा झाली असून ती वापरयोग्य नसल्याने त्यांनी ही कार्यालये तालुक्याच्या ठिकाणी थाटली आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना विविध दाखले, सातबारा, वारस नोंदी, फेरफार आदींसाठी जुन्नरला हेलपाटे मारायला लागत आहेत. त्यामुळे या कार्यालयांच्या इमारतींची शासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी घाटघरचे माजी सरपंच पोपट रावते यांनी निवेदनाद्वारे जुन्नर तहसीलदारांकडे केली आहे.
या गावांपैकी घाटघर, अंजनावळे, राजूर या पेसा क्षेत्रातील गावांमधील तलाठी कार्यालयांची अतिशय दयनीय झाली आहे. येथील कार्यालयांच्या फरश्या उखडल्या असून काही ठिकाणी दरवाजे, खिडक्या गायब झाल्या आहेत. तर अनेक ठिकाणचे पत्रे गळत असून येथे कचरा साचल्याचे चित्र आहे.
त्यामुळे येथील तलाठ्यांनी जुन्नर येथील महसूल भवनात आपले कार्यालय थाटले आहे. या अधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजाच्या वेळेत तरी त्यांना दिलेल्या मुख्यालयी थांबावे व नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी आदिवासी नेते मारुती वायाळ यांनी केली आहे.
शेतीची कामे सोडून…
घाटघर या तलाठी सजेच्या अंतर्गत घाटघर, फांगुळगव्हाण, खडकुंबे, उसरान, पूर, शिरोली, चावंड ही गावे येतात. याचप्रकारे इंगळून, राळेगण, जळवंडी, उंडेखडक आदी सजांच्याअंतर्गत पाच ते आठ गावांचा समावेश होतो. त्यामुळे येथील ग्रामस्थांना शेतातील कामे सोडून विविध महसुली कामांसाठी जुन्नर गाठावे लागते. अनेकदा ग्रामस्थ येथे आल्यानंतर अधिकारी जागेवर नसणे किंवा कार्यालय बंद असणे आदींमुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.