जांबूत – ऐन ऑक्टोबर हिटच्या झळांनी पिकांची अवस्था केविलवाणी झाली असताना विजेच्या अतिरिक्त भारनियमनाचा फटका या पिकांना बसत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. बिबट्याच्या भीतीने रात्री पाणी देता येत नाही अन् दिवसा विजेच्या भारनियमामुळे पिकांची तहान भागवता येत नाही. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांच्या वाढीवर परिणाम झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
पिंपरखेड, जांबूत येथील वीज उपकेंद्रांना आंबेगाव तालुक्यातील काठापूर येथील वीजकेंद्रातून वीजपुरवठा होतो. विजेचा तुडवडा निर्माण झाल्याने महावितरण कंपनीकडून कोणतीही कल्पना न देता अचानक भारनियमन केले जात आहे. सध्या ऑक्टोबरच्या कडक उन्हाबरोबर ढगाळ वातावरणामुळे पिकांची अवस्था बिकट झाली असून पाणी दिल्यानंतरही कडक तापमानात पिके कोमेजून जातात.
अशा अवस्थेत शेतीपंपाना आठ तासांपैकी चार तास वीजपुरवठा त्यात विजेच्या तांत्रिक अडचणी, लंपडाव यामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाल्याने जनावरांची चारा पिके, ऊस, मका, तसेच मलचिंगचा वापर करून घेतलेल्या तरकारी पिकांची अवस्था केविलवाणी झाली आहे.
तरकारी पिकांचे उत्पादन घटणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच कायदा आणि नियमावर बोट ठेवणाऱ्या महावितरणच्या संबंधित अधिकारी यांना ही वीज कधी जाणार व कधी येणार याची कल्पना नसल्याचे अधिकारी आणि कर्मचारी सांगत असल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. अस्मानी संकटाशी दोन हात करून पिकवलेल्या शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. भारनियमनामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने पिकांचे नुकसान होत असून तरकारी पिकांचे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
रात्रीचा वीजपुरवठा सकाळी दहापर्यंत असावा
ऑक्टोबर महिन्यात शेतीपंपाना आठवड्यातील तीन दिवस रात्री वीजपुरवठा सुरू आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना रात्री बाहेर पडावे लागत असून बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतीपंपाना रात्रीचा वीजपुरवठा हा सकाळी दहा वाजेपर्यंत असावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.