Rajsthan Election 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांमधील शाब्दिक युद्ध अधिक तीव्र झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांच्या भाजपमध्ये कथित बाजू मांडल्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘2018 मध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर 2020 मध्ये ते पाडण्याचा प्रयत्न झाला, त्याला वसुंधरा राजे यांनी विरोध केला होता. त्यामुळे भाजप त्यांना बाजूला सारत आहे.
गुरुवारी (19 ऑक्टोबर) गेहलोत दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात माध्यमांशी बोलत होते. यावेळी गेहलोत खोचक टोला लगावत म्हणाले की, “वसुंधरा राजे यांच्याबाबत भाजपची भूमिका ही त्यांची अंतर्गत बाब आहे, पण मी सांगू इच्छितो की कृपया माझ्यामुळे वसुंधरा यांना शिक्षा करू नका.”
2020 मध्ये सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला
यामागील घडामोडींचा संदर्भ देताना ते म्हणाले की, ‘जुलै 2020 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट (काँग्रेस नेते) यांच्या नेतृत्वाखाली 22 आमदारांनी बंडखोरी सुरू केली. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आली आणि अखेर बंडखोर आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला.’
हे बंड आणि सरकार पाडण्याचा कट भाजपनेच रचला होता, असे गेहलोत म्हणाले. पण राज्यातील पक्षाचे दोन मोठे नेते वसुंधरा राजे सिंधिया आणि कैलाश मेघवाल यांनी सरकार पाडण्यास पाठिंबा दिला नाही. भाजपवर टीका करताना अशोक गेहलोत म्हणाले की, त्यामुळे वसुंधरा राजे यांना बाजूला केले जात आहे.
गेहलोत यांनी स्वत: आणि सचिन पायलट गटाच्या समर्थकांमधील गटबाजीचे दावे फेटाळले आणि ते म्हणाले की राजस्थानमध्ये पक्ष एकसंध आहे आणि उमेदवारांच्या निवडीवरून कोणताही संघर्ष नाही.
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू झाली असून, राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा करण्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सातत्याने मागणी होत आहे. खरं तर, 2018 पासून आजपर्यंत काँग्रेसकडून अशोक गेहलोत आणि भाजपच्या वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री म्हणून सरकारचे नेतृत्व केले आहे. गेल्या वेळी, 2018 पूर्वी, वसुंधरा राजे सिंधिया मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यांनी जनतेच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. 2018 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे खापरही त्यांच्यावर ठेवण्यात आले होते.