वेळ नदी कोरडी ठाक : पाणी सोडण्याची मागणी
तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील वेळ नदी कोरडी ठाक पडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. आवर्तन लांबल्यास शेती, दुग्ध व्यवसायावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
शिरूर तालुक्यात यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. यंदा मार्च महिन्यातच दुष्काळाची चाहूल लागली आहे.
दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तळेगाव ढमढेरे गाव वेळ नदीच्या पाण्यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. चासकमान कालव्यातून वेळानदीला पाण्याचे आवर्तन सोडले जाते. उन्हाळी आवर्तन चासकमान कालव्यातून सोडले होते.
परंतु तळेगाव ढमढेरे बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचायच्या आधीच आवर्तन बंद झाल्याने तळेगाव ढमढेरे वेळनदीचे बंधारे कोरडे ते कोरडेच राहिले. यामुळे परिसरातील विहिरी, कुपनलिका यांनी तळ गाठला आहे.
शेतीबरोबर पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय परिसरात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. शेतीसाठी तसेच चाऱ्यांसाठी वेळ नदीला तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.