पुणे : १९६७ च्या लोकसभा निवडणुकीची मुदत संपण्यापूर्वीच केंद्रात इंदिरा गांधींनी लोकसभा भंग करून १९७१ च्या निवडणुका लावल्या. या पाचव्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर मोहन धारीया यांनी विजय मिळविला.
स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय असलेले आणि समाजावादी असलेले धारीया हे १९६४ ते १९७१ या कालावधीत राज्यसभेवर खासदार होते. मात्र, त्यानंतर त्यांनी १९७१ मध्ये पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविली. त्या काळी काँग्रेस नेते चंद्रशेखर आणि धारीया हे काँग्रेसचे तरूण तुर्क नेते म्हणून ओळखले जात.
या निवडणुकीत धारीया यांनी जनसंघाचे रामचंद्र काशिनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी यांचा पराभव केला. धारीया यांना २ लाख ८ हजार १५० मते मिळाली, तर रामभाऊ म्हाळगी यांना १ लाख १३ हजार ६६२ मते मिळाली.
या निवडणुकीत पुण्यातील एकूण मतदार ५ लाक २९ हजार ४१ होते. त्यातील ३ लाख ५९ हजार ४८५ मतदारांनी (६८ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. या लोकसभेसाठी जवळपास १२ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यात एका महिला उमेदवाराचाही समावेश होता. त्यानंतर सात जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले, तर पाच उमेदवारांमध्ये ही लढत झाली.
यात मोहन धारीया, रामभाऊ म्हाळगी यांच्यासह समजावादी नेते भालचंद्र (भाई) वैद्य, बापू कांबळे यांच्यासह आणखी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंग़णार होते. यात धारीया यांनी मोठ्या फरकाने विजय मिळविला. त्यानंतर पुढे पाच वर्षे धारीया हे इंदिरा गांधींच्या केंद्रातील सत्तेत नियोजन, गृहनिर्माण आणि शहरी विकास राज्यमंत्री होते.