रोहन मुजूमदार
पुणे -पुणे जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामात ऊसदराचा प्रश्न निस्तेज पडण्याची शक्यता आहे. बारामती, इंदापूर, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, भोर या ऊस पट्ट्यात ऊस दरवाढीसाठी रान पेटविणारी शेतकरी चळवळच अस्तगत होण्याच्या मार्गावर असल्याची खंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात विशेषत: बारामती, इंदापूर हे तालुके सहकारी साखर कारखानदारीशी निगडीत आहेत. राज्यात कायमच चर्चेत असलेल्या माळेगाव कारखान्याच्या ऊस उत्पादकांसाठी यंदा तावरे गट लढा देणार का? या चर्चेला धुराडे पेटण्यापूर्वीच सुरूवात झाली आहे. तसेच सोमेश्वर कारखान्याचे विरोधक असलेले सतीश काकडे अधूनमधून विरोधात आवाज उठवतात.
परंतु त्यातही आधीसारखा जोर नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पृथ्वीराज चाजक यांना थेट छत्रपती कारखान्यातील महत्त्वाच्या कामातच सामावून घेतल्याने ते विरोधात आवाज उठवण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळे सध्यातरी कारखान्यांत विरोधक नसल्याचे चित्र आहे. मात्र, निवडणुकीत काही राजकीय खेळी फिरल्या तर मात्र, विरोधकांची धार तेज होणार यात काही दुमत नाही.
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील कारखान्यांत तर नावालाही विरोधक दिसत नाही. शिरूर, भोरमधील कारखान्यांमध्ये विरोधक आहेत, पण त्यांचा आवाज अधूनमधून येतो. त्यात आक्रमकता नसल्याचे ऊस उत्पादकांचे म्हणणे आहे. दौंड येथील कारखाना शक्यतो बंदच असतो. ज्यावेळी सुरू होतो. त्यावेळी विरोधक जागे होतात. त्यामुळे जिल्ह्यात ऊस उत्पादकांच्या प्रश्नासाठी भांडण्यासाठी तसा विरोधकच नसल्याची खंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मांडली आहे.
देशातील साखर उद्योग अनिश्चिततेच्या गर्तेत असण्यामागे अनेक कारणे आहेत. नैसर्गिक परिस्थिती, साखरेचे गरजेपेक्षा अधिक उत्पादन, मागणी आणि पुरवठ्यातील असमतोलामुळे साखरेच्या दरातील सततचे चढ-उतार, सरकारी धोरणे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धा वगैरे घटक त्यासाठी कारणीभूत आहेत.
मात्र, स्पर्धेत टिकण्यासाठी स्थानिक पातळीवर कारखाना प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या विरोधकांची नितांत आवश्यकता आहे. दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा बाजारभाव मिळण्यासाठी शेतकरी चळवळ जिल्ह्यात जोर धरली नाही, ही शेतकऱ्यांसाठी शोकांतिकाच आहे.
राजू शेट्टींनाच लावले गळाला
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळवून देण्यात शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे शेट्टी हे गाळप हंगाम सुरू झाला की ऊस दरासाठी रस्त्यावर उतरणारे वेळप्रसंगी आक्रमक होतात.
मात्र, राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून ते विधानपरिषदेवर राष्ट्रवादीच्या कोट्यातून जाणार आहेत. त्यामुळे सर्वांत प्रबळ विरोधक असलेले शेट्टी यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी गळाला लावले असल्याने आगामी काळात ते ऊस उत्पादकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणार की त्यांचाही आवाज दाबला की ते मध्यस्थाची भूमिका बजावणार, याची चर्चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच झाली आहे.
माळेगावातील विरोधक नावालाच
माळेगाव कारखान्यावर मागील पंचवार्षिकमध्ये तावरे गटाने सत्ता मिळवली होती; मात्र फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत तावरे गटाला धूळ चारून राष्ट्रवादीने कारखाना पुन्हा ताब्यात घेतला आहे. त्यातच तावरे गटाचे अवघे तीनच सदस्य असल्याने आपसुकच त्यांचा आवाज दाबला जाणार, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही, हे निश्चित.