पगारासाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा कामी
वाघोली – वाघोली ग्रामपंचायतीच्या ७९ कर्मचाऱ्यांचा पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन मनपाप्रमाणे त्यांना वेतन व भत्ते मिळणार असल्याने त्यांच्या लढ्याला अखेर न्याय मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
वाघोलीचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर तत्कालीन ग्रामपंचायतीच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना पुणे पालिकेच्या तात्पुरत्या आस्थापनेवर समाविष्ट करून घेण्यात आले होते. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत वर्ग करून घेण्यासाठी ग्रामपंचायतचे आजी माजी पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा पाठपुरावा सुरू होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या संदर्भात वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता.
या पाठपुराव्याला यश मिळाले असून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत वर्ग करून घेण्याबाबतची अधिसूचना महानगरपालिकेने काढली आहे. तसेच त्यांना 30 जून 2021 पासूनचा वेतनातील फरक सुद्धा मिळणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व स्थानिक पाठपुरावा करणाऱ्या सर्व मंडळींचे आभार मानले आहे. जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा व लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा मनपा प्रशासन व राज्यातील मंत्र्यांकडे सुरूच होता. कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करणाऱ्या मंडळींचे आभार मानले आहेत.
पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासन यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या मनपात समावेश करण्याच्या तसेच त्यांना मनपा प्रमाणे वेतन व भत्ते देण्याच्या पाठपुराव्याला यश आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी देखील पाठपुरावा सुरूच आहे. याकामी सर्व लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांची मोलाची मदत व सहकार्य झाले आहे.
– अनिल सातव पाटील, अध्यक्ष, हवेली तालुका भाजप युवा मोर्चा.