दौंडमध्ये पक्षाची स्वतंत्र वाटचाल : झेडपीसाठी तिसऱ्या आघाडीला बळ मिळणार?
भाऊसाहेब ठाकूर
राहू – दौंड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घटिका समीप येत असल्याने राजकीय वातावरण बदलत आहे. पाटसमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते पाटील यांनी झेडपीची निवडणूक रासप स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे रासपाच्या भूमिकेमुळे राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता आहे. रासपाने स्वतंत्र चूल मांडली तर आगामी निवडणुकीत भाजपाची डाळ शिजणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे दौंडमध्ये या वक्तव्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. दौंडमध्ये सत्ता बदलण्याची ताकत निश्चितच राष्ट्रीय समाज पक्षामध्ये आहे, हे 2014 मधील लोकसभा निवडणुकीत दिसून आले. दौंड तालुक्यातून महादेव जानकर यांनी भरीव मताधिक्य दिल्यानंतर संपूर्ण राज्याचे लक्ष दौंडने वेधून घेतले होते. त्या लाटेवर आमदार राहुल कुल हे स्वार होत विजयी झाले होते.
आगामी निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष हा काय भूमिका घेतो, यावर भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा जरी भाजपाचा सहयोगी पक्ष असला तरी त्यांच्यात संवादाची दरी रुंदावली असल्याचे दिसत आहे. जानकर यांना मानणारा वर्ग हा आमदार कुल यांच्या बाजूने झुकतो, हे 2014 पासून दिसले आहे. त्यामुळे झेडपीच्या निवडणुकीत आमदार कुल यांना याची फटका बसू शकतो.
राजकीय समीकरणे बिघडविणार?
दौंड तालुक्यात धनगर समाजाचे प्राबल्य मोठे आहे. विशेषत: बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते हे राष्ट्रीय समाज पक्षाला मानणारे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या भूमिकेमुळे दौंडमधील समीकरणे निश्चितच बदलू शकतात. याच राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव जानकर यांनी लोकसभेला पंचवीस हजार मतांचे लीड दिलेले आहे. एक आमदार देखील दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद ही दौंडमध्ये कमी लेखून चालणार नाही.
तिसऱ्या आघाडीला बळकटी
दौंड तालुक्यात प्रस्थापित राष्ट्रवादी आणि भाजपाला डावलून तिसऱ्या आघाडीची मोट बांधली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पाटस मध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय समाज पक्षाने आपली भूमिका जाहीर केली. दोन्ही पक्षांकडून डावलले काही सक्षम नेते हे राष्ट्रीय समाज पक्ष व तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब अजमावू शकतात. त्यामुळे तिसऱ्या आघाडीला बळकटी मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
रासपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी घोषणा केली आहे. ती अंतिम आहे. त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, आम्ही राज्यातच नव्हे तर देशात देखील प्रत्येक निवडणूक ही स्वबळावर लढणार आहोत.
– महादेव जानकर, अध्यक्ष, राष्टीय समाज पक्ष.