एसटीच्या सर्व फेऱ्या बंद केल्याने प्रवाशांचे हाल
मंचर – मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात एसटी बस गाड्याचे नुकसान झाले, या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर आणि नारायणगाव एसटी आगारातील बसगाड्या मंगळवारी (दि. 31) दिवसभर मंचर आणि घोडेगाव बस स्थानकावर न आल्याने नाहीत. सकाळच्या वेळी अचानक एसटी बस बंद झाल्याने मंचर बस स्थानकावर शुकशुकाट पाहावयास मिळाला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी बेमुदत संप आंदोलन सुरू करण्यात आले असून अनेक गावांमध्ये नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले असून, त्यांची प्रकृती खालवत चालली असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी एसटी महामंडळाच्या गाड्या लक्ष्य केल्या आहेत.
एसटी गाड्याचे अधिक नुकसान होऊ नये, या पार्श्वभूमीवर एसटीच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार राजगुरूगर आणि नारायणगाव एसटी आगारातून मंचर, नारायणगाव, पुणे, मुंबई आदी लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या सर्व एसटी बस सकाळी साडेआठनंतर बंद करण्यात आल्या आहेत.
मंचर येथे कॉलेजसाठी आलेले विद्यार्थी तसेच मंचर, खेड या ठिकाणावरून पुणे, मुंबई व बाहेरगावी गेलेले प्रवासी अडकून पडले असून, मंचर बस स्थानकावरून बस न मिळाल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले.
117 पैकी 101 फेऱ्या रद्द
राजगुरुनगर एसटी आगारातून बसच्या एकूण 117 फेऱ्या आहेत, त्यातील 101 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. एसटी विभागातील वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर एसटी बस चालू केल्या जातील, असे राजगुरुनगरच्या आगार प्रमुख पल्लवी पाटील, सहायक वाहतूक अधीक्षक टी. एन. पवळे यांनी सांगितले.