पुणे – तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना भेदभाव न करता शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश द्यावेत. तसेच त्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यास टाळाटाळ करू नये, असे सक्त आदेश समाजकल्याण विभागाने सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना दिले आहेत.
समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. केंद्र शासनाने तृतीयपंथाचे हक्कांचे संरक्षण व कल्याण अधिनियम व तृतीयपंथीय संरक्षण व कल्याण नियम लागू केले आहे. तृतीयपंथीय हा समाजातील एक दुर्लक्षित घटक आहे. या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक दिली जाते. त्यामुळे त्यांना शिक्षण घेताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यांच्यावर मानसिक परिणाम होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भेदभाव न करता प्रवेश देणे आवश्यक आहे.
तसेच, महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यास टाळाटाळ करत असलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थांना विद्यापीठाने सूचना देण्यात याव्यात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तृतीयपंथी या दुर्लक्षित समाज घटकांच्या प्रश्नांवर कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून महाविद्यालयातील प्रवेशातील अडचणीबाबत संपर्क झाल्यास त्यांना सहकार्य करावे, अशा सूचनाही समाजकल्याण विभागाने शैक्षणिक संस्थांना दिल्या आहेत.