“अमृत जलधारा’साठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ : योजना पुन्हा बारगळणार?
चाकण : अमृत जलधारा पाणी पुरवठा योजनेसाठी चाकणकर नागरिकांना सांगण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची आता चढाओढ सुरू झाली आहे.यांच्या राजकीय हेव्यादाव्यांत पाणीपुरवठा योजना पुन्हा एकदा बारगळणार तर नाही ना अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
चाकण शहरातील पाणी पुरवठ्याचे सध्याच्या परिस्थितीत तीनतेरा वाजले आहेत.एक दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भामा आसखेड धरणात तसेच भामा नदीत मुबलक प्रमाणात पाणी असूनही “धरण उशाला कोरड घशाला’ अशी परिस्थिती आहे. यामुळे पालिकेच्या प्रशासन आणि प्रशासकांबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
पाणी पुरवठ्यावर उपाययोजना करण्याची गरज असताना. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते नुकतीच तांत्रिक मंजुरी मिळालेल्या अमृत जलधारा पाणीपुरवठा योजनेसाठी आम्हीच कसा आणि किती पाठपुरावा केला आहे याचे श्रेय घेऊन सोशल मीडियासह पत्रकार परिषद घेऊन ढोल बडवत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांचे दालनात बैठक घेऊन या योजनेचा अमृत 2.0 मध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक करण्याचे निश्चित केले.
याबाबत मागील चार महिन्यांपासून पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, जिल्हासंघटक अशोक भुजबळ, स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, चाकण नगरपरिषदचे मुख्याधिकारी, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे वरीष्ठ अधिकारी तसेच मंत्रालयात वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केल्याचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.
त्यानुसार तांत्रिक प्रक्रिया पूर्ण घेऊन नुकतीच 165 कोटी 67 लाख रकमेस मुख्यअभियंता, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. या योजना मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आली असून योजनेची उर्वरित मंजुरी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होऊन या महत्वकांक्षी पाणी योजनेला मंजुरी मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
…मीच प्रयत्न केले – वाडेकर
चाकण शहराची वाढती लोकसंख्या,औद्योगिकीकरण व शहराचा होणारा विस्तार लक्षात घेऊन अमृत 2.0 कार्यक्रमाअंतर्गत चाकण शहर पाणीपुरवठा योजनेच्या 165 कोटी 67 लाख रुपयांच्या प्रकल्प आराखड्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने नुकतीच तांत्रिक मंजूरी दिली आहे. यासाठी मीच प्रयत्न केला आहे, असे ठाम वक्तव्य चाकणचे माजी सरपंच व भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर यांनी चाकण येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. यावेळी वाडेकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता रा. सा. राहाणे यांच्या स्वाक्षरीचे पत्र सादर केले.