लोणंद – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत्या रविवारपासून सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी निरा स्नान घाट आणि लोणंद पालखीतळ या ठिकाणी भेट देऊन तयारी संदर्भात आढावा घेतला.
त्यानंतर लोणंद (ता. खंडाळा) येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याच्या टॅंकरची संख्या वाढवावी अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्या ठिकाणावरून पाणी टॅंकरमध्ये भरले जाणार आहे त्याची पाहणी करावी. आरोग्य विभागाने जास्तीत जास्त पथके फिरती ठेवावी. म्हणजे तात्काळ कोणत्याही वारकऱ्यांला आरोग्य सुविधा पुरवता येतील. पालखी सोहळ्यासाठी अधिक पोलीस बंदोबस्त ठेवावा. यासाठी शेजारच्या जिल्ह्यातूनही मदत घ्यावी. प्रशासनाकडून वारकऱ्यांसाठी ज्या सुविधा देण्यात येणार आहेत त्याचे जागोजागी फलक लावावे.
तसेच पालखी सोहळ्यामध्ये स्वच्छतेला जास्त महत्त्व द्यावे अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी केल्या. यावर्षीच्या पालखी सोहळ्या -साठी मोठ्या प्रमाणात टॅंकरची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या ठिकाणावरून पाणी टॅंकरमध्ये भरण्यात येणार आहे ते पाणी स्वच्छ करण्यासाठी पथके तैनात करण्यात आले आहेत. पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक दिंडी प्रमुखांशी संपर्क साधण्यासाठी समन्वयक यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत काही अडचणी असतील त्या सोडवण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यामध्ये रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डूडी यांनी यावेळी सांगितले. बैठकीनंतर पालकमंत्री देसाई यांनी निराघाट व लोणंद येथील पालखी तळाची पाहणी करून दोन्ही ठिकाणी वृक्षारोपण केले.