सासवड -शहरात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व पक्षीय सदस्यांनी सासवड नगरपरिषद ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे, “अन्याय सहन केला जाणार नाही’, “दडपशाही, हुकुमशाही चालणार नाही’ अशा घोषणा देत सासवड मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला.
तर विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी संघटना, आरपीआय, शिवसेना, व्यापारी संघटना, राष्ट्रसेवा दलसह अन्य संघटना सहभागी झाले होते.
सरकारच्या शेती सुधारणा कायद्याच्या विरोधात आज संपूर्ण पुरंदर तालुका कडकडीत बंदमध्ये सहभागी झाला होता. तालुक्याचे प्रमुख ठिकाण म्हणून ओळखले जाणारे सासवड शहर देखील कडकडीत बंद पाळण्यात आला, अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद पाळण्यात आला.
केंद्र सरकारने शेतीमाल उत्पादन विक्री आणि विपणन व्यवस्था याबाबत तीन विधेयक मंजूर करून जी शेतकरी विरोधी आहेत. त्यांचे कायद्यात रूपांतर केले त्यात कोणतेही दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न न करता ती रद्द केली पाहिजेत. याकरता जनतेचा शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान मोर्चा पुकारलेल्या भारत बंदमध्ये शेतकरी संघटनानी पुरंदर तालुका बंदचे आवाहन करून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक बंदमध्ये सहभागी झाले होते.
यावेळी दिलीपराव गिरमे, मार्तंड भोंडे, बाळासाहेब पायगुडे, आभिजीत जगताप, राहुल गिरमे, संजय जगताप, महेश जगताप, बंडूकाका जगताप, भानुदास जगताप, सागर जगताप, मंगलनानी म्हेत्रे, सुनीता कोलते, शिवाजी पोमण, अरूण जगताप, यशवंत जगताप, हारुण बागवान, नवनाथ बोरावके आदी उपस्थित होते.