– हिमांशू
आजमितीस भारत “तरुणांचा देश’ म्हणून ओळखला जातो; पण एकविसाव्या शतकाच्या मध्यात आपल्या देशातील वयोवृद्धांची संख्या वाढू लागेल, असं संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीचा (यूएनएफपीए) ताजा अहवाल सांगतो. किंबहुना वृद्धांची संख्या आताच झपाट्यानं वाढू लागलीये आणि 2050 पर्यंत वृद्धांच्या तुलनेत लहान मुलांची संख्या कमी असेल, असं अहवालात म्हटलंय. अशा स्थितीत भविष्याची चिंता तर आपण केली पाहिजेच; पण त्याहूनही अधिक शक्ती वर्तमान ठीकठाक करण्यासाठी खर्ची घातली पाहिजे.
आज बेरोजगारीचा दर गेल्या अनेक दशकांतील सर्वाधिक असल्याचं आकडेवारी सांगते. सळसळतं तरुण रक्त जगात सर्वाधिक प्रमाणात लाभल्यामुळे आपल्या देशाला “लोकसंख्यात्मक लाभ’ म्हणजेच “डेमोग्राफिक डिव्हिडंड’ लाभलाय, असं सांगितलं जातं. पण त्या लाभाचा वापर खरोखर होतोय का, याचा गंभीरपणे विचार करायची वेळ येऊन ठेपलीय. तूर्तास तरी दुर्दैवानं या प्रश्नाचं उत्तर नकारात्मकच मिळतंय आणि सकारात्मकतेकडील संभाव्य वाटचालीत जे अडथळे दिसतायत, त्यातील प्रमुख अडथळा आहे सामाजिक वातावरणाचा.
आपल्याला लाभलेली प्रचंड ऊर्जा रचनात्मक कामाऐवजी आक्रमकतेकडे अधिक झुकत चाललीये, असं नाइलाजानं म्हणावं लागेल. प्रत्येक क्षेत्रात आक्रमकतेला महत्त्व प्राप्त झालंय. बारकाईनं पाहिल्यास, अगदी खेळ आणि कलांमध्येही शैली, कौशल्य, समयसूचकता आदी गुणांपेक्षा आक्रमकता महत्त्वाची ठरताना दिसेल. राजकारणात तर ती वाढते आहेच आणि सर्व प्रकारच्या आक्रमकतेला “टीआरपी’ही चांगला मिळतोय, हे सर्वांत मोठं दुर्दैव!
आसपास घडणाऱ्या घटनांमधील आक्रमकता, क्रौर्य तर अस्वस्थ करणारं आहेच; पण विवेकाचा आणि माणुसकीचा होत चाललेला ऱ्हासही तितकाच क्लेषदायक आहे. उज्जैनमधील ताजी घटना असो वा मणिपूरमध्ये पुन्हा वाढलेला हिंसाचार असो, आसाम आणि मेघालयात उफाळलेला सीमावाद असो वा आसामात उघड झालेली मोलकरणीच्या छळाची घटना असो, पुढच्या पिढीसमोर वाढून ठेवलेल्या अनिश्चिततेबद्दल चिंता वाटल्याखेरीज राहत नाही. उज्जैनमध्ये अत्याचारग्रस्त किशोरवयीन मुलगी अडीच तास अपुऱ्या कपड्यांनी कशीबशी अब्रू झाकायचा प्रयत्न करत तीन तास चालत राहिली.
वसाहती, टोलनाका, हॉटेलं, ढाबे… असा आठ किलोमीटरचा रस्ता तुडवणाऱ्या त्या रक्तबंबाळ मुलीला अंग झाकण्यापुरते कपडे द्यावेत, असंही कुणाला वाटलं नाही. अखेर दांडी आश्रमात तिला आसरा मिळाला. तिथून फोन जाईपर्यंत कुणी पोलिसांनाही कळवलं नव्हतं. अशा घटना “रोजचं मढं’ झाल्यामुळे आपल्याला त्याचं काही वाटेनासं झालंय की काय, ही शंका अस्वस्थ करते. तिकडे आसामात एक लष्करी अधिकारी आणि त्याची पत्नी अल्पवयीन मोलकरणीला छळताना क्रौर्याची सीमा ओलांडतात. डांबून ठेवणं, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण… आणि ते रक्त चाटायला लावणं, डस्टबिनमधले पदार्थ खायला लावणं… बापरे!
बेकायदा बालमजुरी, छळ, पॉक्सो, एससी-एसटी कायदा अशा अनेक कलमांखाली पतीपत्नी अटकेत असले, तरी संबंधित मुलगी पायऱ्यांवरून पडल्यामुळे जखमी झाल्याचं सांगतायत. दात तुटलेली, नाकाचं हाड मोडलेली मुलगी मात्र आपला छळ झाल्याचं सांगतेय. वाढती अशांतता, क्रौर्य आणि आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर किमान मुलाबाळांच्या भविष्याची चिंता वाटायलाच हवी. दोन राज्यांमध्ये सीमावाद असू शकतो; पण आसाम-मेघालयचे लोक एकमेकांवर धनुष्यबाण आणि गलोरीने हल्ले चढवत असतील तर प्रकरण गंभीर आहे. देश “तरुण’ असेपर्यंतच हे संपायला हवं.