बेलसर – पुरंदर तालुक्यात अलीकडील काळात वाटाणा पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने बाजरी वाटाणा, घेवडा, पावटा, सोयाबीन यासारख्या पिकांच्या पेरण्या जास्त प्रमाणात झाल्या होत्या. तालुक्यातील वाटाणा आता बाजारात दाखल झाला असल्याने पुरंदरमधील वाटणा तोडणी जोमात असे चित्र आहे.
पुरंदर तालुक्यातील मुख्य पीक वाटाण्याचे आहे. दरवर्षी तालुक्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल या पिकातून होत असते. अगदी राज्यभरातील खवय्ये पुरंदरच्या गोड वाटाण्याची अगदी आवर्जून वाट पाहत असतात; परंतु या वर्षी पावसाचे तब्बल दोन महिने उशिराने आगमन झाले त्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या व बाजारात पुरंदरचा वाटाणा उशीरा दाखल झाला आहे. परंतु राज्यभरातील बाजारात पुरंदरच्या वाटाण्याला विशेष मागणी आहे.
वाटण्याचे उत्पादन हे मध्यप्रदेश, ग्वाल्हेर, दिल्ली या ठिकाणी सर्वाधिक घेतले जाते. महाराष्ट्रात पारनेर आणि पुरंदर भागात वाटाण्याची पेरणी केली जाते; मात्र पुरंदरचा वाटाणा आपल्या अप्रतिम चवीने राज्यात प्रसीद्ध आहे या भागात अर्कल व गोल्डन, एपी 3 या जातीच्या वाटाण्याची पेरणी केली जाते. आज सुद्धा पुणे, मुंबई येथील बाजारपेठेत बाहेरिल वाटाण्याच्या तुलनेत येथील वाटाण्याला जास्तीचा बाजारभाव मिळत असतो.
फळबागे व्यतिरिक्त वाटाण्यातून मोठी उलाढाल तालुक्यात होत असते. स्थानिक सासवड बाजारपेठेत बाहेरिल पेण, मुंबई, सांगली, सातारा, महाड येथील व्यापारी खरेदीसाठी गर्दी करत असतात. तालुक्यात दिवे, सासवड, जेजुरी येथील बाजारात मोठ्या प्रमाणात वाटाणा खरेदी केली जाते. सध्या महामार्गालगत शेतकरी स्वत: वाटाणा विक्रीसाठी बसलेले असतात. त्यामुळे जागेवरच तोडणी केल्यावर लगेच ग्राहकांपर्यंत माल पोहोचला जातो.त्यामुळे मालाला चांगला बाजारभाव मिळतो.
असा आहे बाजारभाव
पुरंदर तालुक्यात स्थानिक बाजारपेठेत 50 ते 80 रुपये प्रति कीलो विक्री केली जात आहे तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 35 रुपये ते 70 रुपये प्रती किलो बाजारभाव मिळत आहे.