यशवंत कारखाना पुन्हा सुरू करण्याची हवेलीकरांची मागणी
राजेंद्र काळभोर
लोणी काळभोर – यशवंत कारखान्याबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने 2014 मध्ये आश्वासनांची खैरात केली. परंतु त्यावर विश्वास न ठेवता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या भागातील मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असूनही सरकारच्या विरोधात मतदान केले.
भाजपच्या उमेदवाराने विधानसभेला प्रचार सभांमधून यशवंतच्या मालकीची एक गुंठाही जमीन न विकता कारखाना सुरू करणार असे आश्वासन दिले होते. मतदारांनी त्यावर विश्वास ठेवून मते दिल्याने त्यांनी विजय संपादन केला. तत्कालीन खासदारांनी सुद्धा सहा महिन्यात यशवंत सुरू करतो, असे उरूळी कांचन येथील जाहीर सभेत सांगितले होते. परंतु निवडणूक झाल्यावर सदर बाब ते सोईस्कररीत्या बारगळली. तसेच शिरूर तालुक्यामध्ये शेतकरी मेळाव्यानिमित्त आलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यानी यशवंत पंधरा दिवसात सुरू करतो, असे आश्वासन दिले, परंतु 2014 ते 2022 पर्यंत कारखान्याबाबत सर्वपक्षीयांनी आश्वासनांचे गाळप केले.
आता कारखाना नक्कीच सुरू होणार असा आशावाद सभासद व कामगार बंधूनी बाळगला. परंतू कारखान्याच्या मालकीची 118 एकर जमिनीच्या विक्रीचे अधिकार राज्य सहकारी बॅकेला देऊन बॅकेकडूनही अपेक्षाभंग झाल्याने सभासद व कामगार पुन्हा निराशेच्या गर्तेत गेले. आता कारखान्यावरील अवसायक हटवण्याचा आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. हा आदेश देऊनही तीन महिने होत आले आहेत. तरीही या संदर्भात शासकीय पातळीवर कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या दिसत नाहीत.
हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना व हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या सहकारी संस्था तालुक्याच्या मुख्य रक्तवाहिन्या मानल्या जायच्या. येथूनच सहकाराच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील काहीजण आमदार, खासदार, विविध बॅंकेचे संचालक व तालुक्यातील महत्वाच्या पदी निवडले गेले.
त्यामुळे एकेकाळी यशवंत कारखाना व हवेली तालुक्याचा जिल्ह्यातील राजकारणात दबदबा होता. परंतु आर्थिक अनियमिततेमुळे यशवंत कारखान्याला घरघर लागल्याने तालुक्यातील शेतकरी, सभासदांचे अर्थकारण मंदावले आहे. परिणामी या भागातील ऊस पिकाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे यशवंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार नाही, असा काहींचा आक्षेप आहे.
यशवंत कारखान्याच्या कार्यक्षेत्रात नागरीकरण जरी वाढले असले तरी प्रतिदिन 1250 किंवा 2500 मेट्रीक टन गाळप क्षमता असलेला एक कारखाना आरामशीर चालू शकतो. परिसरात गुऱ्हाळे मोठ्या संख्येने सुरू आहेत. या गुऱ्हाळांनी ऊस न्यावा म्हणून शेतकऱ्यांना गुऱ्हाळ मालकांच्या पाया पडावे लागते. परिणामी स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन शेतकऱ्यांना जास्त भाव मिळण्यासाठी यशवंत साखर कारखाना सुरू होणे गरजेचे आहे.
– नानासाहेब झेंडे, उस उत्पादक शेतकरी
सभासद, शेतकऱ्यांची झोळी रिकामीच…
सुमारे वीस हजार सभासद व एक हजार कामगारांच्या कुटुंबांच्या चुलीशी निगडीत असलेला साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत आहे. कोणत्याही पक्षाच्या राजकीय लोकप्रतिनिधींना याबाबत सोयर – सुतक राहिले नसून मागील काही वर्षांपासून फक्तयशवंतचा राजकीय सोयीनुसार तालुक्यातील व जिल्ह्यातील पुढारी सोयीस्कर वापर करत आहेत. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांची झोळी अजून रिकामीच आहे. फक्त आश्वासनांवर त्यांची बोळवण करण्यात येत आहे.