नांदूर : दौंड तालुक्यातील कांदा प्रमुख नगदी पीक असून चालू वर्षी कांदा लागवड सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा लागवड खोळंबली आहे. शेतात अजूनही चिखल असल्यामुळे परिपक्व झालेली रोपे आणि आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेला हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
बियाणे, दुबार मशागतीच्या भांडवली खर्चात वाढ, अशा दुष्टचक्रात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला, अर्थकारणाला चालना देणाऱ्या कांद्यासाठी दिवाळीपूर्वी रोपे टाकली. महागडी बुरशीनाशक व कीडनाशकांची फवारणी करून ती कशीबशी जगवली.
शेणखत टाकून मशागत करून वाफे सरी बांधून कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली होती, परंतु अवकाळी पावसामुळे संकट निर्माण केले आहे. अजूनही ढगाळ वातावरण असल्याने व कडक ऊन पडत नसल्याने दुबार मशागतीसाठी वेळ जाणार आहे. त्यामुळे कांदा लागवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पुढचेही सारे नियोजन कोलमडले आहे.
ढगाळ वातावरणात धुके व भरपूर प्रमाणात दवबिंदू पडत असल्याने महागडे बी पेरणी करून परिपक्व झालेली तयार रोपे अग्रभागी पिवळी पडून कुजत आहेत. प्रमुख नगदी कांदा पिकाचा हंगाम वाया जाण्याची धाकधूक वाढली आहे. त्यातच हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे आर्थिक कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.
अवकाळीने अर्थकारण बिघडले
कांदा लागवडीनंतर आणि काढणीवेळी अवकाळी पाऊस, गारपिटीने अस्मानी संकट तसेच शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा पिकाचा उत्पादन खर्च सुद्धा मिळत नाही. यंदा उन्हाळी कांदा लागवड व उत्पादन कमी असल्याने बाजारभाव तेजीत राहण्याचा अंदाज शेती अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु अवकाळी पावसाने सर्व गणित बिघडले आहे.