पुणे – कोयना धरणातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाणी कमी केल्यानंतर किती वीज विकत घ्यावी लागेल. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जलसंपदा, महानिर्मिती आणि महाजेनको यांना दिल्या आहेत. यामध्ये कोयना धरणातून दहा टीएमसी पाणी कमी केल्यानंतरचा आराखडा आणि पंधरा टीएमसी पाणी कमी केल्यानंतरचा आराखडा तयार करून किती वीज खरेदी करावी लागेल, याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
कोयना जलाशयातील पाणीसाठा वापराबाबत मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रशांत मयेकर, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगिरी, महावितरणचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, एमएलडीसीचे कार्यकारी संचालक शशांक जवळकर, कोयना धरणाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे उपस्थित होते.
धरणात 25 टक्के पाणीसाठा कमी
कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी. आहे. एकूण जलाशयाच्या प्रमाणात या वर्षी जवळपास 25 टक्के पाणीसाठा कमी आहे. कोयना धरणातील 67 टक्के पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्यात येते. मात्र, यावर्षी जलसाठा कमी असल्यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी उपलब्ध करून देणे, शेतीसाठी पाणी देणे आवश्यक आहे. त्यानुसार हे नियोजन केले जात आहे.