केंद्र सरकारच्या निर्यात बंदिच्या निर्णयावर आळेफाटा उपबाजारात शेतकरी संतप्त
राजुरी – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार कांद्याचे बाजार आळेफाटा येथे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांनी शुक्रवारी (दि, 8) कांदा लिलाव बंद पाडला होता. मात्र काही वेळानंतर पुन्हा सुरू करण्यात आला.
केंद्र सरकारने अचानक कांद्याची निर्यात बंद केल्याने कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी संतप्त झाला आणि आळेफाटा (ता. जुन्नर) येथे सुरू असलेले लिलाव बंद पाडला. त्यानंतर सर्व शेतकर्यांनी उपबाजार आळेफाटा येथे एकत्रित येऊन घोषणाबाजी करीत शासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.
सरकारने कांदा दर नियंत्रणासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे दोन दिवसांपूर्वी 40 ते 50 रुपये विकला जाणारा कांदा एकदम 22 ते 25 रुपयांवर आल्याने शेतकरी संतप्त झाल्याने उपस्थित कांदा उत्पादक शेतकर्यांनी एकत्र येवून बाजार समितीत सुरु असलेले कांदा लिलाव बंद पाडले. यामुळे काही काळ बाजार समिती परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी वरूण सोनवणे, संतोष साळी, संभाजी आवारी, दादाभाऊ नरवडे, ज्ञानेश्वर शेटे, संपत काळे, सागर कुर्हाडे, गणेश आवारी, संतोष शिंदे आदी कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, प्रियंका शेळके प्रीतम काळे, धोंडीभाऊ पिंगट, धनेश संचेती, पांडुशेठ गाडगे, सचिव रुपेश कवडे यांनी शेतकर्यांच्या समस्या जाणून घेत समजुन घेऊन चर्चा करुन आधी झालेलेे लिलाव रद्द करुन अडतदारांना परत फेर लिलाव करण्याचा सूचना दिल्या. त्यानंतर शेतकर्यांनी जवळपास तीन ते चार तास बंद पाडलेला कांदा लिलाव परत सुरू केला. तसेच या संदर्भाचे निवेदन उपस्थित शेतकर्यांनी आळेफाट्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे व वडगाव आनंदचे मंडलाधिकारी डी. बी. काळे यांना दिले.
भविष्यात जर कांद्याला चांगला भाव मिळाला नाही तर आळेफाटा येथील चौकात रास्ता रोको आंदोलन करणार आहोत.
– वरुण सोनवणे, शेतकरी