संगमनेर – म्हाळुंगी नदीवरील पूल हे खासदार बाळासाहेब विखे यांचे श्रेय होते. नगरपालिकेने एकही रुपया खर्च केला नव्हता. याचे श्रेय द्यायचे असेल तर खा. विखे आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांना दिले पाहिजे. या पुलाला स्व. बाळासाहेब विखे यांचे नाव दिले पाहिजे, अशी मागणी संगमनेर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी केली.
संगमनेर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरचिटणीस जावेद जहागीरदार, तालुकाध्यक्ष वैभव लांडगे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ हे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, म्हाळुंगी नदीच्या पुलासाठी निधी उपलब्ध करून देणारे मंत्री विखेच आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये नाटकी नाला सुशोभिकरणासाठी 7 कोटी निधी आला होता. परंतु हा निधी वापरला गेला नाही. तो निधी व्यापारी संकुलाचा दुसरा आणि तिसरा मजला वापरण्यासाठी वळविला. याचे टेंडर यांच्या नातेवाईकांकडेच होते. पुलाचे काम क्रॉसमध्ये करायचे नाही असे असताना भुयारी गटाराचे काम केले गेले. ठेकेदाराने संरक्षण भिंत तोडून टाकली. त्यामुळे त्यांचे ठेकेदार पोसण्यासाठी हा घाट घातला जातोय का असा प्रश्न निर्माण होतो.
पुरात म्हाळुंगी नदीवरील पूल खचला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र दिले. त्याप्रमाणे मंत्री यांनी पुलासाठी साडे सात कोटींचा निधी वर्ग केला. भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याने याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण निधी उपलब्ध करून देणारे विखेच आहेत. मंत्री विखेंनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात, तेव्हा निधी मंजूर झाला,मी केले म्हणून असे स्टेस्टमेंट कोणी करत असेल तर त्यांनी कागद दाखवावा. असा टोलाही गणपुले यांनी नाव न घेता आ.थोरात यांना लगावला.