रामदास आठवले यांचे मत
शिक्रापूर – आगामी निवडणुका आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून लढवणार असून चिन्ह मिळविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदीच हेच पर्याय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला चारशेंच्या पुढे जागा जिंकून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान मजबूत करायचे आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भीमा येथे २०६ व्या शौर्यदिनी आठवले यांनी अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री क्रांती रेडकर, प्रशासकीय अधिकारी समीर वानखेडे उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, एनडीएमध्ये निमंत्रक किंवा संयोजक पदावरून कोणताही वाद नसून आम्हाला देशभरात लोकसभेच्या दहा जागा मिळाव्यात. मात्र, त्यात दोन जागा महाराष्ट्रातील मिळाव्यात, अशी मागणी करीत राज्यात ज्या दोन जागा आम्ही मागत आहोत. त्यात शिर्डी व सोलापूरची जागा आहे. शिर्डीमधून आपण स्वत: लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.
ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जिंकणे आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून देणे हाच माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. लोकसभेसंदर्भात ओपिनियन पोलमध्ये महायुतीला कमी जागा दाखवल्या. मात्र, आम्ही चाळीस जागा जिंकणार आहोत. यापूर्वीचे निवडणुकांमधील सर्व्हे काय होते आणि निकाल काय आले, हे सर्वांनी पाहिले असताना देशात निर्माण करण्यात आलेली इंडिया आघाडी ही विकासासाठी नसून फक्त मोदींना हरविण्यासाठी आहे