पुणे – शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्या नागरिक, संस्था तसेच व्यावसायिक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य उपविधी २०१७ लागू आहे. त्यानुसार अस्वच्छता करणार्या नागरिकांकडून मनपा प्रशासन दंड आकारते.
तसेच त्यानंतर गुन्हे दाखल करण्याची तरतूदही आहे. यात बदल केले जाणार असून, रस्त्यावर कचरा टाकल्यास १८० ऐवजी महापालिकेकडून ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. आता बदल केलेली उपविधी शासन मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी दिली.
शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत कारवाई केली जाते. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, लघुशंका करणे, थुंकणे, कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, कचरा जाळणे, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर, ओला कचरा जिरविण्यासाठी बल्क वेस्ट यंत्रणा कार्यान्वित न ठेवणे आदी प्रकरणात हा दंड केला जातो. मात्र, या दंडाची रक्कम पूर्वी शासन मान्यतेने निश्चित करण्यात आली आहे. त्यात कालानुरूप वाढ झालेली नाही.
त्यातच उघड्यावर कचरा टाकल्याबद्दल होणारा दंड १८० रुपये आहे. ही रक्कम कमी असल्याने काही व्यक्ती बिनदिक्कत कचरा उघड्यावर टाकतात. पकडले गेल्यास दंड भरून मोकळे होतात. त्यांना आळा बसावा, यासाठी या दंडाच्या रकमेत वाढ केली जावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे.
४ महिन्यांत १ कोटी रुपये वसूल
शहरात गेल्या चार महिन्यांत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे, तसेच उघड्यावर कचरा टाकणार्या नागरिकांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सुमारे २४ हजार नागरिकांकडून सुमारे एक कोटी रुपयांचा दंड दि. १ आॅक्टोबर ते ३० डिसेंबर या कालावधीत वसूल करण्यात आला आहे. मनपाच्या १५ क्षेत्रीय कार्यांलयांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी सांगितले.