पुरंदरला भाजपाकडून बेरजेचे राजकारण शिवतारे यांची गोची
अमोल बनकर
सासवड : भाजपाकडून बारामती लोकसभा मतदारसंघावर मिशन बारामती मोहिमे अंतर्गत लक्ष केंद्रित करून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या केला जात आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे प्रवेश भाजपाकडून करून घेण्यात येत आहेत. बारामती मतदारसंघांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना शह देण्यासाठी माजी आमदार अशोक टेकवडे यांचा पक्षप्रवेश भाजपाकडून करून घेतला आहे. बारामती लोकसभेची जागा भाजपच्या वाटेवर असल्याने या जागेवर भाजपचा घरचा उमेदवार म्हणून लोकसभेला अशोक टेकवडेंना संधी मिळू शकते. तर माजी मंत्री विजय शिवतारेंनी आधीपासूनच आपली उमेदवारी जाहीर करून जाहीर करून मतदारसंघाचा दौरा देखील केला होता. परंतु त्यांच्यावर आता नामुष्की ओढवण्याची वेळ येऊ शकते.
पुरंदरच्या ग्रामीण भागासह सासवड व जेजुरी शहरांमध्ये भाजपाची ताकद वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मधून अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे बारामती मिशन ही मोहीम यशस्वी ठरते का, हे देखील येणाऱ्या काही काळामध्ये ठरणार आहे. लोकसभेच्या मागील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे या पुरंदरमध्ये पाठीमागे होत्या. परंतु आता अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद घटत असल्याचे संकेत आहेत. येणाऱ्या काळामध्ये खासदार सुळे यांच्या मताधिक्यात घट की घटलेली मतदान भरून काढण्यासाठी राष्ट्रवादीचे राहिलेले नेते एक वाटतात, हे पाहणे औचित्याचे ठरेल.
पुरंदरच्या महायुतीमध्ये दोन माजी आमदार एकत्र येणार असल्याने पुरंदरच्या महायुतीला ताकद मिळत आहे. परंतु शिवतारेंनी थोपटलेले दंड आता पुन्हा शमणार असल्याचे दिसते आहे. तर टेकवडे यांचा प्रवेश हा विजय शिवतारे यांची डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात आहे. तर विजय शिवतरे यांनी माजी आमदार टेकवडे यांच्यावर आमदारकीच्या काळामध्ये बारामतीचा घरगडी असल्याचे टीका करत शिवतारेनी पुरंदरमध्ये विजय मिळवला होता.
पुरंदरमधून दिवसेंदिवस राष्ट्रवादीची ताकद घटत असल्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी डोकेदुखी ठरू शकते. कृषी बाजार समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडली होती. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांना संधी न दिल्यामुळे तो गट देखील नाराज असल्याची चर्चा पुरंदरच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये हा गट देखील लोकसभेला खासदार सुळे यांचे काम करणार की नाही, याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.
महिन्यात नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भानुदास जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संतोष ए. जगताप कुंभारवळचे माजी सरपंच सचिन पठारे यांच्यासह अनेक जणांनी प्रवेश केला होता. हा एक मोठा धक्का राष्ट्रवादीसाठी होता. तर यामुळे पुरंदर राष्ट्रवादीतील गळती थांबणार की अजून वाढणार, याकडे देखील नागरिकांचे लक्ष आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अजून एक गट भाजप किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे.
सुळे या पुरंदर दौऱ्यावर आल्यानंतर फक्त नेत्यांनाच भेटत असतात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी बोलत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीवर नाराजी वाढल्याची चर्चा आहे. यापुढे सुळे या पुरंदरमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी किती वेळ देतात, यावर लोकसभेचे भविष्य अवलंबून आहे.
पक्ष, बैठका महत्त्वाच्या
राष्ट्रवादी कॉंग्रेसला गळतीचे ग्रहण थांबवायचे असेल तर गावपातळीवर त्याचबरोबर तालुकापातळीवर दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकांची गरज आहे. त्यांची मनधरणी करणे देखील महत्त्वाचे आहे. पक्ष संघटना मजबुतीसाठी अंतर्गत गटबाजी थांबणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात राष्ट्रवादीचे दोन दोन गट आहेत, हे दोन्ही गट एकत्र करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.