आदिवासी पश्चिम भागात वादळी पावसाची दमदार हजेरी
तळेघर – आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागाला गुरुवारी (दि. 9) सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर गुरुवारी दुपारपासून आकाशात ढग भरून आले आणि सायंकाळी अचानक सहापासून वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांची धांदल उडाली. पावसाने सुमारे तीन तास हजेरी लावली. हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजाची दिवाळी या वर्षी कडू होणार आहे.
मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह भीमाशंकर, निगडाळे, तळेघर, जांभोरी, फलोदे, पाटण चिखली, राजेवाडी आणि आजूबाजूच्या भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांची भातपीक वाचविण्यासाठी धावपळ सुरू आहे. या पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरून वाहू लागली असून, काही ठिकाणी तर भातखाचरांना तळ्याचे स्वरूप आले आहे आणि भात पिके भुईसपाट झाली आहेत. मात्र या पावसामुळे वातावरणात गारवा आला आहे.
हिरडा पिकालाही जोरदार फटका
अचानक आलेल्या या वादळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे हक्काचे उत्पन्न असलेला हिरड्यालाही चांगलाच फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्नही हिरावले गेले आहे. शासनाने लवकरात लवकर शेतीचे आणि हिरड्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.