कोपरगाव – चालूवर्षी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मतदार संघातील हजारो शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा घेतला असून नुकसान होऊनदेखील आजपर्यंत शेतकऱ्यांना अग्रिम पीकविम्याची रक्कम मिळालेली नाही. त्याबाबत जलद गतीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे, कृषी विभागाचे मुख्य सचिव अनुपकुमार यांच्याकडे केली आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रधानमंत्री पिकविमा योजना सन 2023 च्या खरीप हंगामात कोपरगांव विधानसभा मतदार संघातील 45,062 शेतकऱ्यांनी एकूण 64,023 पिकविमा अर्ज दाखल केले होते. चालू खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती. तरीदेखील अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी बाजरी, मका, तूर, भुईमुग, सोयाबीन, कापूस, कांदा आदी पिकांची पेरणी केली होती.
परंतु कोपरगाव, सुरेगाव, दहेगाव, रवंदे, पोहेगाव व पुणतांबा मंडलामध्ये जवळपास दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामाच्या उत्पन्नामध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्यामुळे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी राज्य व्यवस्थापक, ओरिएन्टल इन्शुरन्स विमा कंपनीला शेतकऱ्यांना अग्रीम पीकविम्याची रक्कम देण्याचे आदेश देऊन त्याबाबत अधिसूचना देखील प्रसिद्ध केली होती.
परंतु संबंधित कंपनीने त्याबाबत सहाय्यक आयुक्त, कृषी विभाग यांच्याकडे हरकती नोंदवून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आक्षेप घेतला होता. याबाबत अद्यापपर्यंत सुनावणी प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची रक्कम लवकर मिळावी, यासाठी तातडीने सुनावणी घ्यावी.