वनविभागाची हतबलता – आमदार बेनके
नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील बिबट्यांची संख्या आवाक्या बाहेर गेल्याने वन विभागाची हातबलता दिसून येत असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे. तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने बिबट्यांची वाढती संख्या विचारात घेऊन नसबंदी करणे व पिंजरा लावणे यासाठी वनविभाग कमी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. बिबट्याची संख्या अवाक्या बाहेर गेल्याने त्या तुलनेत वनविभागाकडे पिंजर्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा कुठे लावावा असा प्रश्न वनविभागा पुढे निर्माण झाला आहे.
बिबट्याची वाढती संख्या बघता त्याच्यावर दीर्घ व कमी कालावधीसाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्यासंदर्भात राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मीटिंग झाली होती. त्यानुसार बिबट प्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी राज्य सरकारच्या पातळीवर कायदे तयार करून ते केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी म्हटले आहे.
जुन्नर तालुक्यात वनविभागाला दोन आरएफओ असून त्यांची संख्या तीन करावी आणि वनपाल व वनक्षेत्रपालाकडे असलेल्या गावांची संख्या कमी करून वनपाल व वनक्षेत्रपालांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. तसेच पिंजर्यांची संख्या वाढवून जिथे बिबट्या दिसेल तिथे तो पकडला तरच मानवावर होणारे हल्ले कमी होण्यास मदत होईल.
बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा वीज मिळावी..
जुन्नर तालुका बिबट प्रवण क्षेत्र असल्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, गावोगावी पथदिवे लावावे, त्याचे वीजबिल सरकारने भरावे अशी मागणी अधिवेशनात करणार असल्याचे आमदार बेनके म्हणाले. गावातील पथदिव्यांचे वीजबिल ग्रामपंचायतीने भरावे असा सरकारने कायदा केला असला, तरी लहान गावे असलेल्या ग्रामपंचायतीला कमी उत्पन्न व मळ्यातळ्यांचा विस्तार असल्याने पथदिव्यांचे विज बिल भरणे शक्य होत नाही. तालुक्यातील प्रस्तावित केलेले महावितरणचे नऊ सबस्टेशन जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत असा प्रकल्प राबवता येणार नाही. असे असले तरी तालुक्यातील मंजूर झालेल्या तीन सब स्टेशनची निर्मिती लवकरात लवकर करावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे बेनके यांनी सांगितले.