नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील वारुळवाडी येथील खोडद रस्त्यावरील गव्हाळी मळ्यात अनिल नानाभाऊ यांच्या घराजवळील गायीच्या गोठ्यात पाच ते सहा महिन्यांच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला.
गायी व वासरे ओरडण्याचा सोमवारी (दि.5) पहाटे आवाज येत होता. दरम्यान, दत्ता भुजबळ हे शेण काढत असताना त्यांना कालवड गोठ्याच्या बाहेर ओढून नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी वारुळवाडीचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ यांना फोनवरून घटनेची माहिती दिली.
वनविभागाचे वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वन कर्मचारी खंडू भुजबळ यांनी पंचनामा करून योग्य ती मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले. स्थानिक शेतकर्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली असून वनविभाग लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करणार आहे.
दुसर्या घटनेत मांजरवाडी गावच्या हद्दीत मोरे मळा येथे पांडुरंग अनंता मोरे यांच्या उसाच्या शेताच्या बाजूला पिंजरा लावण्यात आला आहे. वनविभागाच्या उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले,
वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, कर्मचारी खंडू भुजबळ, आपदा मित्र सुशांत भुजबळ, नारायणगाव पोलीस स्टेशनचे ग्रामसुरक्षा दलाचे जवान राम चोपडा, गेनभाऊ खोकराळे, अजित केसकर, बाजार समितीचे समितीचे संचालक माऊली खंडागळे यांच्या मागणीनुसार पिंजरा लावण्यात आलेला आहे.