अकोले – निळवंडे धरणाचे श्रेय घेण्यासाठी सद्या स्पर्धा सुरू असली तरी अकोले तालुका सर्व जाणतो श्रेय कुणाचे आहे ? धरणाची जागा निवडण्यापासून ते घळभरणी , प्रकल्पग्रस्तांचे आदर्श पुनर्वसन, फक्त अकोले तालुक्यासाठीचे उच्चस्तरीय पाईप बंद कालवे ही काम आपण केली.याचे श्रेय आपल्याला घेण्याची इच्छा नाही पण या धरणासाठी बाळासाहेब थोरात यांचे निश्चित मदत झाली हे नाकारून चालणार नाही, असे रोखठोक वक्तव्य माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी केले .
अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडले असून हे पाणी कालव्यामधून वाहू लागले. सुगाव बुद्रुक शिवारात पाणी आल्यानंतर आज लाभार्थी शेतकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी श्री.पिचड यांना निमंत्रित करून त्यांच्याहस्ते कालव्यामध्ये साडी चोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून जलपूजन करण्यात आले. यावेळी पिचड बोलत होते.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, दूध संघाचे व्हॉईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे , माजी प. स.सदस्य अरुण शेळके, सरपंच अनुप्रिता शिंदे, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र देशमुख, सचिन देशमुख, विजय भांगरे उपस्थित होते. पिचड म्हणाले की, निळवंडे धरणाचे आठ टीएमसी पाणी आणि लाभधारक चारपट आहेत.
यांना पाणी कसे वाटप करणार हा सरकार पुढे प्रश्न आहे. निळवंडेच्या शेतचाऱ्याकधी होणार, त्या शेतचाऱ्याचे पाणी कसे वाटणार ? अलीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक झाली. यामध्ये अकोल्याला भंडारदऱ्याचे पाणी लागते, त्याचबरोबर निळवंडेचे पाणी कालव्याच्या वरच्या अकोले तालुक्यावरच्या भागाला द्या .कारण भंडारदऱ्याचे पाणी बारमाही आहे आणि निळवंडेचे पाणी आठमाही आहे. चुकीचे सांगून भंडारदराचे पाणी खाली पळवून पाणी वाटायचा कार्यक्रम होईल. त्यामुळे भंडारदराचे पाणी अकोले तालुक्याला पाहिजे आणि निळवंडे कालव्याचे वरचा बाजूला उपेक्षित भाग त्याला निळवंडेचे पाणी द्या, असे ही पिचड म्हणाले. माझं भाग्य मला निळवंडे सारखे धरण उभ करता आले. अकोले तालुक्याच्या हक्कासाठी आपण भक्कमपणे उभे राहू. जास्तीत-जास्त पाणी तालुक्याला मिळवून देऊ. उपलब्ध पाण्याचा काटकसरने वापर करा.शेततळी बांधा, ड्रिपवर जा, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी दीपक फर्गडे, राहुल देशमुख, नरहरी देशमुख, विजय देशमुख , सचिन उगले, शुभम देशमुख, शशिकांत देशमुख, पंढरीनाथ वाकचौरे, दत्तू भांगरे, सूरज देशमुख, वैभव देशमुख, आशा देशमुख, लिलाबाई देशमुख, संगिता देशमुख , जयश्रीशमुख, बनिता देशमुख, भागवत देशमुख, माणिक देशमुख आदी उपस्थित होते.
पवारांचे पाणीवाटपात योगदान
निळवंडे धरणाला दोन्ही बाजूने मुख्य कालव्यासह फक्त अकोले तालुक्यासाठी पाईप बंद कालवे अजित पवारांनी मंजूर केले. यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. याचे श्रेय घेणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की हे कालवे संगमनेरला का नाही ? भंडारदरा धरणाचे पाण्याचे फेर वाटप झाले तेव्हा आंदोलन केले. शरद पवार यांनी भंडारदराचे पाण्याचे फेर वाटप करून घेतले आणि अकोले, संगमनेरला हक्काचे पाणी मिळाले. ज्याच श्रेय त्याला द्यावं, असा टोलाही पिचड यांनी लगावला.