विद्यार्थी, पालक वैतागले एकाच अर्जासाठी दोन-दोन प्रक्रिया महा ई-सेवा, सेतू केंद्रात होतेय गर्दी
नीरा – दहावी-बारावीच्या निकालानंतर पुढील शिक्षणासाठी विविध प्रकारचे दाखले लागतात ते मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची महा ई-सेवा व सेतू केंद्रात गर्दी होत आहे; मात्र सातत्याने सर्व्हर डाउन होत असल्याने या विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक व वेळेचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग, आयटीआय तसेच विविध पदविकेसाठी प्रवेश घेण्याची लगबग सुरू होते. या प्रवेशासाठी प्रथम त्यांना दाखल्यांची जुळवाजुळव करावी लागते. असे दाखले महा ई-सेवा व सेतू केंद्रात उपलब्ध होतात. पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, वाल्हे, नीरा, पिसर्वे, परिंचे, गराडे, माळशिरस आदी मोठ्या गावतील विविध केंद्रांमध्ये असे दाखले काढण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.
मात्र बऱ्याचदा सर्व्हर डाउन होत असल्याने एकाच अर्जासाठी दोनदा प्रक्रिया करावी लागत असल्याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. दाखल्यासाठी त्यांना ई- सेवा केंद्राचे उंबरठे झिजवावे लागत आहे. शेतकऱ्यांनाही या सर्व्हर डाउनचा त्रास होत आहे.
1 जुलै पासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून नवीन कर्ज मिळत असते. त्यासाठी सातबार व आठ “अ’ काढावा लागतो. आता सर्वत्र ऑनलाइन झाल्याने तलाठ्याकडून हस्तलिखित सातबारे दिले जात नाहीत. त्या ऐवजी महाईसेवा केंद्रातूनच सातबारा काढावा लागतो. अशा वेळी सर्व्हर डाऊन झाल्यास शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.
दिवसभर कार्यलयीन वेळेत कितेक विद्यार्थी कागदपत्रे घेऊन येतात. सतत सर्व्हर डाऊन असल्याने फॉर्म भरताना वेळ जातो. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी रात्री उशिरा किंवा पहाटे लवकर कार्यालयात येऊन कामे उरकावी लागत आहेत.
– प्रमोद कदम, महा ई सेवा केंद्र चालक, नीरा
अर्जासाठी माहिती देताना मध्येच सर्व्हर डाउन होतो. मध्येच इंटरनेटची रेंज गायब होते. मग पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागते. शहरातच नव्हे तर खेड्यातही अशीच परिस्थिती आहे. याचा अम्हाला नाहक त्रास सहन करावा लागतो. ही तांत्रिक अडचण दूर व्हायला हवी.
– सलोनी निगडे, विद्यार्थी, नीरा