बाजारभाव नसल्याने भांडवलसुद्धा वसूल होईना
लोणी धामणी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे हे गाव बटाटा पिकाचे आगार समजले जाते; मात्र गेली काही वर्षे या भागात बटाटा लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. दिवसेंदिवस पावसाचे घटते प्रमाण, बाजारभावाची अनिश्चितता, मजुरांचे वाढलेले भाडे या सर्व गोष्टीमुळे बटाटा पीक घेणे म्हणजे पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखे असल्याचे येथील प्रसिध्द बटाटा उत्पादक शेतकरी निवृत्ती मिंडे, बाबाजी चौधरी, कांताराम तांबे, राघू रणपिसे, संभाजी सरडे या शेतकऱ्यांनी सांगितले.
कोरड्यात केलेली लागवड त्यानंतर दोन महिने पावसाने फिरवलेली पाठ, त्यानंतर अंतिम टप्प्यात झालेला अतिपाऊस आणि आता निघालेल्या थोड्याफार पिकाला बाजारभावाने दिलेला फटका यामुळे चालू पिकाचे भांडवल देखील वसूल झाले नाही. परिणामी बटाटा पीक अंगावर आल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे; मात्र दरवर्षी येथील शेतकरी तोट्यात जात असल्याने आर्थिक व्यवहार फिरेनासे झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच जयश्री तांबे, उपसरपंच बिपीन चौधरी, माजी सरपंच मनोज तांबे, माजी उपसरपंच मयूर सरडे, गणेश तांबे यांनी केली आहे.
बटाटा अशी आमची ओळख झाली होती; परंतु निसर्गाचा अनिश्चित पणा, बाजारभावापेक्षा खर्च जास्त अन् उत्पन्न कमी, मजूर न मिळणे किंव्हा मिळाले तरी त्यांच्यावर भरमसाठ खर्च यामुळे शेती करणे खूप अवघड झाले आहे. शेतीपेक्षा एखादा चांगला प्रकल्प जर शिरदाळे या ठिकाणी उभारला तर त्याचा चांगला फायदा होईल. तसेच शासनाने देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे चांगली मदत करावी.
-मयूर सरडे, माजी उपसरपंच, शिरदाळे
सरसकट मदत मिळावी
सुरुवातीपासूनच कमी पाऊस पडल्याने उत्पन्न घटले आहे. सध्या दहा किलोला 100 ते 120 असा मातीमोल बाजारभाव मिळतो आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने पंचनामे केले असले, तरी बटाटा लागवड खातेधारकांना सरसकट मदत मिळावी. अशी देखील मागणी येथील सर्व शेतकरी करत आहेत.