शेती, उद्योग आणि व्यवसायाला भरारी मिळणार : अनिलतात्या मेहेर
नारायणगाव – ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे 8 ते 11 फेब्रुवारी 2024 रोजी शेती, उद्योग आणि व्यवसायाला भरारी देण्यासाठी कृषीमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी दिली.
कृषीमहोत्सवात शेतकर्यांना उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित ग्लोबल तंत्रज्ञान संधी मिळणार आहे. कृषीमहोत्सवाचे उद् घाटन 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
कृषीमहोत्सवात शेतकर्यांसाठी विविध नामांकित कंपन्यांची फळे, भाजीपाला, फुलांच्या पिकांचे भव्य डेमो प्लॉट उभारले असून तीनशेहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची दालने असणार आहेत. कंपन्यांचे नवीन तंत्रज्ञान शेतकर्यांना माहिती करून घेता येईल व शेतमाल विक्री करण्याकरिता करार शेतीच्या विविध नामी संधी मिळतील.
कृषीमहोत्सवात पौष्टिक तृणधान्य, न्युट्रीमिलेट्स, पोषणबाग, नैसर्गिक शेतीची प्रात्यक्षिके, कृषी यांत्रिकीकरण, विविध अवजारे व ड्रोनद्वारे फवारणी, एफपीओ व महिला बचत गट उत्पादनाचे स्वतंत्र दालन, कृषितज्ञामार्फत परिसंवादामध्ये शेतकर्यांना मार्गदर्शन, फळ, धान्य व मिलेट्स महोत्सव, पशुपालन व्यवसाय व चारा पिके माहिती यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन कृषी महोत्सवात करण्यात येणार आहे.
कृषीमहोत्सवात महाराष्ट्रातील तसेच, देशभरातील शेतकरी सहभागी होतील. कृषीमहोत्सवामुळे शेतकर्यांना त्यांची शेती उद्योग आणि व्यवसायात रूपांतरित करण्याची संधी मिळेल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल असे कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांनी म्हटले आहे.
कृषीमहोत्सवाची माहिती अधिक जाणून घेण्यासाठी केंद्राचे कृषी विस्तार प्रमुख राहुल घाडगे मो. नं. 9422080011 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे यांनी केले.