शंकर दुपारगुडे
कोपरगाव – देशासह जगातील रामभक्तांना अयोध्यानगरीचे वेध लागले आहेत. येत्या २२ जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना भव्य मंदिरात होणार असल्याने संपूर्ण अयोध्या नगरी उजाळून निघाली आहे. श्रीरामाने चौदा वर्षे वनवास भोगला, तो केवळ आपल्या वडीलधाऱ्यांचा सन्मान म्हणून. पण त्या श्रीरामांच्या भक्तांना अयोध्येत राम मंदिर व्हावे, यासाठी तब्बल पाचशे वर्षे संघर्ष करीत वनवास सोसावा लागला. आज श्रीरामाची अयोध्या उजळली असून, कारसेवकांच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
१५ व्या शतकापासून अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे, तो ढाच्या पाडला पाहिजे, यासाठी पाचशे वर्षे संघर्ष सुरू होता. सर्वात मोठा संघर्ष सन १९९२ साली झाला आणि हजारो कारसेवक, हिंदुत्ववादी स्वयंसेवकांनी जीवाची पर्वा न करता धर्माच्या अस्मितेवर लागलेला कलंक पुसण्यासाठी तत्कालीन उत्तरप्रदेश सरकारच्या गोळ्या छातीवर झेलत संबंधीत ढाचा पाडला. त्यावेळी शेकडो कारसेवकांचा मृत्यू झाला. अनेकांना शरयू नदीने पोटात सामावून घेतले. कारसेवकांच्या बलिदानामुळे आज अयोध्यानगरी उजळली म्हणूनच कोपरगावसह देशभरातील कारसेवकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. कोपरगाव तालुक्यातील ५० ते ६० कारसेवक व हिंदुत्ववादी स्वयंसेवक अयोध्येत गेले होते. केवळ धर्मनिष्ठा मनी बाळगून कोपरगावचे कारसेवक गेले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही कोपरगावचे काही कारसेवक ढाच्याच्या दिशेने जाऊन श्रीरामाचा जयघोष केला होता.
पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. रानावनात राहीले. रामभक्तीसाठी शक्ती पणाला लावणाऱ्या करसेवकामध्ये माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, विनीत वाडेकर, रविंद्र बागरेचा, शंकर कडू,जगदीश दुशिंग, सोमनाथ शिंगाडे, हिरालाल तवरेज, नीलेश दगडे, कृष्णा कोसंदल, नंदू गवते, दत्ता पुंड, वसंत जाधव यांच्यासह अनेक कारसेवकांचा सामावेश आहे. हे कारसेवक श्रीराम मंदिर उभारण्याच्या संघर्षापासन ते नव्याने राम मंदिर उभारण्यापर्यंतचे साक्षीदार ठरले आहेत. तर स्व.मनील वायखिंडे, स्व. नितीन कानडे, स्व.बाळू पगारे,स्व. किरण गवळी, स्व.संजय उमाजी जगताप, स्व.संतोष घाडगे यांच्यासह इतर कारसेवक हे राम मंदिराच्या संघर्षात सहभागी होते. मात्र, आज राम मंदिराच्या सोहळ्यात दुर्दैवाने ते सहभागी नाहीत.
परंत, त्यांच्या संघर्षांच्या आठवणींना आज कोपरगावकर उजाळा देत आहेत. हिंदुत्ववादी स्वयंसेवक, कारसेवकांनी संघर्ष केला म्हणून त्यांच्या योगदानामुळे आज अयोध्येत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले. त्यानिमित्ताने देशभरात दिवाळी साजरी केली जाते. कारसेवकांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता व श्रेयवादात न पडता त्यांनी जो संघर्ष केला, त्या संघर्षाच्या आठवणी पुन्हा ताज्या होत आहेत. अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिराबरोबर मर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे संपूर्ण कोपरगाव तालुक्यात मंगलमय वातावरण निर्मित झाले आहे. मनामनात श्रीरामाचा नारा आणि घराघरात राम उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू झाली असली तरी ज्यांच्या त्याग व समर्पनामुळे हा दिवस तेजोमय होतो, त्या कोपरगावच्या करसेवकांप्रती अनेकांनी ऋण व्यक्त केले. पुढील हजारो वर्षे अयोध्येतील श्रीरामाचे हे मंदिर मानवजातीला प्रेरणा देणारे राहील, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.