जांबूतमध्ये खंडेराय मंदिराचे जीर्णोद्धार भूमिपूजन : सभामंडपासाठी 24 लाखांचा निधी मंजूर
जांबूत – मंदिराचे काम सुरू करा. खिशात एक पैसा नसला तरी आपोआप तिजोरी भरेल. महिला, मुलींना व्यवसाय शिक्षण दिले गेले पाहिजे.आज तरूण पिढीला काम मिळत नसल्याने आत्महत्या हा पर्याय निवडला जातो. मंदिर तर होईलच. परंतु समाजामध्ये मुली मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यामुळे मंदिराबरोबर शिक्षण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
जांबूत (ता. शिरुर) येथे ग्रामदैवत कुलस्वामी श्री मार्तंड खंडेराय मंदिराच्या जीर्णोद्धार भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. वळसे पाटील म्हणाले, आपल्या कुटुंबात, गावात, समाजात वागत असताना एकमेकांना सहकार्य करून एक विचार ठेवला तर गावाची प्रगती निश्चितच होते.
हे मंदिर अंदाजे साडेतीन कोटी रूपयांचे काम एक हजार वर्षे टिकेल अशा पद्धतीने हेमांडपंथी शैलीत बांधकाम करणार आहे, असे मंदिराचे अर्किटेक्ट संदीप पेठे यांनी सांगितले. मंदिराच्या सभामंडपासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे माध्यमातून 24 लाख रुपये मंजूर केले. याप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पेठे अँड असोसिएटचे शशिकांत पेठे,
भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राजेंद्र गावडे, निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, वासुदेव जोरी, सरपंच दत्तात्रय जोरी, उपसरपंच राणी बोऱ्हाडे, पोपट थिटे, सावित्रा थोरात, दिलीप सोदक, बिपीन थिटे, बाळासाहेब फिरोदिया, बाळासाहेब पठारे, बाळकृष्ण कड उपस्थित होते. सूत्रसंचालन लहू गाजरे यांनी केले. ग्रामपंचायत सदस्य राहूल जगताप यांनी आभार मानले.