निमगाव म्हाळुंगी येथील बैठकीत गावकऱ्यांचा निर्धार
शिक्रापूर – सध्या महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाची ठिणगी पेटत असून मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे लढत आहेत. राज्य आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याने जोपर्यत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत मागे हटायचे नाही, असा निर्धार करीत आधी आरक्षण मग इलेक्शनचा निर्धार मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने ग्रामदैवत म्हसोबा महाराज मंदिरामध्ये नुकतेच सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सकल मराठा समाज व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता महाराष्ट्रभर गावागावात पेटत असेलल्या आंदोलनाची सरकारने दखल घेण्याची गरज आहे.
शिरूर तालुक्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन वेगळ्या वळणावर चाललेले असताना नुकतेच शिरूर- हवेलीचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या पत्नी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्या असून तळेगाव ढमढेरे येथे देखील नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे
तर शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा, जातेगाव खुर्द, पिंपळे खालसा, कुरुळी यांसह आदी गावांमध्ये नेत्यांना व पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक झळकू लागले आहेत. शिक्रापूरमध्ये देखील लवकरच काही मराठा समाज बांधव लवकरच साखळी उपोषण करणार असल्याचे जाहीर केल्याने शिरूर तालुक्यात हे आंदोलन चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
जनजागृती फेरी, घोषणा
यावेळी गावातून मेणबत्ती घेऊन मराठा आरक्षण जनजागृती फेरी काढण्यात आली. सभेत मनोज जरांगे पाटील यांनी उभे केलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन चालू असेपर्यंत आणि मराठा समाजाला कायदेशीदृष्ट्या टिकेल असे आरक्षण सरकार जोपर्यंत जाहीर करीत नाही. तोपर्यंत संविधानिक पदावर काम करणाऱ्या सर्व राजकीय पक्षाच्या आजी- माजी पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घालण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे. आधी आरक्षण मग इलेक्शन असा नारा देत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.