लोणी धामणी परिसरातील गावांचे म्हणणे
लोणी धामणी – आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरातील 10-15 गावांना अद्याप म्हाळसाकांत योजनेचे पाणी नाहीच परंतु आता दुष्काळ जाहीर करण्यात देखील आंबेगाव तालुक्याला डावलण्यात आल्याने या भागातील लोकांना आता दुर्दैवाने ‘दुष्काळ आमचा हक्काचा’ म्हणण्याची वेळ आली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर या दोन तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा तर शिरूर, दौंड आणि इंदापूर या तालुक्यात मध्यमस्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे हे सर्व तालुके रब्बी हंगामाचे आहेत. तरी देखील रब्बी हंगामापूर्वीच तेथे दुष्काळ जाहीर करण्यात आला. पाठोपाठ या तालुक्यांना दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये उपायोजना आणि सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
जमीन महसूलात सूट, पिक कर्जाचे पुनर्गठन. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती. कृषीपंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. लोणी, धामणी, वडगावपीर ,मांदळेवाडी, शिरदाळे ,पहाडदरा, रानमळा आणि खडकवाडी गावचा काही भाग हा दुष्काळग्रस्त आहे. खरीप हंगामात सलग तीन महिने येथे पाऊस न झाल्याने खरीप पिक आले नाही.
निकषानुसार या भागाला दुष्काळ जाहीर करणे अत्यंत आवश्यक होते. परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. गेल्या 30 ते 32 वर्षांपासून म्हाळासाकांत जलसिंचन योजनेची मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे. या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या. त्यामुळे दुर्दैवाने या भागातील गावांना दुष्काळा आमच्या हक्काचा अशी मागणी करण्याची वेळ आली आहे. पाणी मिळाले नाहीच; परंतु आता दुष्काळ मिळून सरकारी सवलती तरी मिळतील का याकडे लक्ष लागले आहे.
लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी, पहाडदरा, शिरदाळे ही सहा गावे कायमची दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात.या परिसरासाठी 35 वर्षांपासून म्हाळसाकांत जलसिंचन योजना लोक प्रतिनिधींनी झुलवत ठेवली आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने या परिसरातील अनेक कुटुंब शहरात नोकरी निमत्ताने स्थलांतरित झाले आहे. दुष्काळग्रस्त तालुका म्हणून आंबेगाव तालुक्याचे नाव नसणे हे दुर्दैवी आहे. सध्या आंबेगावचे दोन्ही लोकप्रतिनिधीं सत्तेत आहे. त्यामुळे जल सिंचन योजना मार्गी लागावी अशी अपेक्षा आहे.
– रवींद्र करंजखेले, माजी सदस्य, पंचायत समिती सदस्य, आंबेगाव तालुका