जलाशयात 29 हजार क्युसेकने पाणी : वाटचाल 50 टक्क्यांकडे
टेंभुर्णी – पुणे जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसात झालेल्या पावसामुळे मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी नद्यांतून आलेल्या पाण्यामुळे उजनीच्या वरील 19 पैकी 16 धरणे शंभर टक्के भरली. खाली दौंडकडे भीमा नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढत गेला व एक ऑक्टोबर पर्यंत उजनी जलाशयात 38 टक्के पाणीसाठा तयार झाला.
2 ऑक्टोबर रोजी सकाळी 39 हजार 895 क्युसेक्स असणारा विसर्ग सायंकाळपर्यंत 29हजार 850 क्युसेक्स झालेला असून सध्या उजनी जलाशयात याच विसर्गाने पाणी येत आहे व येणाऱ्या विसर्गात घट निर्माण झाली आहे.
धरणामध्ये 87 टीएमसी पाणीसाठा तयार झाला असून टक्केवारी 45.26 टक्के आहे. यापुढे उजनीची वाटचाल 50 टक्क्यांकडे सुरू आहे.
दरम्यान 2 ऑक्टोबर पासून सीना माढा व दहिगाव सिंचन योजनेतून खरीप आवर्तन सुरू झाले असून, नागरिक व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून करकंब वॉटर स्टोरेज टॅंक व आष्टी तलाव भरुन घेण्यासाठी 3 ऑक्टोबर पासून उजनी कालव्यात पाणी सोडण्यात येणार असल्याचे धरण नियंत्रण विभागाकडून वृत्त आहे, उजनी धरण 100 टक्के भरण्यासाठी पुणे जिल्ह्यातील परिसरात आणखीन मोठ्या मुसळधार पावसाची आवश्यकता आहे.