– माधव विद्वांस
विनोदी लेखक, नाटककार, पत्रकार, कवी, विडंबनकार म्हणून प्रसिद्ध दत्तू बांदेकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1909 रोजी बेळगाव येथे झाला. सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर ते पुणे येथे आले. कालांतराने वर्ष 1941 मध्ये मुंबईला चरितार्थासाठी आले. सुरुवातीस अनेक किरकोळ कामे केली. “रांगणेकर-काणेकर’ संपादित “चित्रा’ या साप्ताहिकात प्रूफरीडर म्हणून रुजू झाले व तेथेच त्यांच्या लिखाणास सुरुवात झाली. “चित्रा’ साप्ताहिकातील नोकरी सुटल्यावर त्यांनी “भरारी’ हे स्वत:चे साप्ताहिक सुरू केले होते; पण ते बंद पडले. आचार्य अत्रे यांच्या “नवयुग’मध्ये ऑक्टोबर 1942 पासून ते मृत्यूपर्यंत नोकरी केली. बांदेकर प्रसिद्धी पराङ्मुख होते.
ते सार्वजनिक ठिकाणी फारसे जात नसत. त्यांनी कधी कुणाशी मैत्री केली नाही, ते कोणाच्याही घरी फारसे गेले नाहीत, त्यांच्याकडे कोणी येतही नसत. त्यांचे लेख मात्र वाचकांमध्ये प्रिय होते, त्यामुळे त्यांना फक्त पाहण्यासाठी कित्येकदा त्यांचे चाहते “नवयुग’मध्ये यायचे.
बांदेकरांना लोकनाट्याची आवड होती. त्यांनी तमासगिरांची दुःखे जाणून घेतली व त्यांच्या प्रश्नांना प्रथमच वृत्तपत्रांतून वाचा फोडली. बांदेकरांचे हे काम निश्चितच महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नवयुगचे पहिले पान दत्तू बांदेकर यांचेच असे. हे लिखाण अनेक वेळा निनावीही असले तरी बांदेकरांची शैली लोकांना माहीत असल्याने याचे लेखक म्हणजे बांदेकरच हे वाचकांच्या लक्षात येत असे. त्यांनी “नवयुग’मधून चित्रपटपरीक्षणे, नाट्यपरीक्षणेही लिहिली. संगीत सौभद्र, संगीत मानापमान अशा नाटकांच्या कथानकावर आधारित विडंबनात्मक लेख लिहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा संदर्भ घेऊन काही विनोदी लघुकथाही त्यांनी लिहिल्या.
बांदेकरांच्या शब्दकोशात काही शब्दांचे मार्मिक अर्थ आहेत: भूक – जी श्रीमंतांना लागत नाही आणि गरिबांची भागत नाही. रस्ता- मोटारीखाली मरण्याची जागा. विद्या- भिकेचे लक्षण. अंबाडा- गंगावन ठेवण्याची जागा. अश्लीलता- जे लेखक फक्त लिहितात आणि सभ्य लोक करतात. खोटा रुपया- जो खर्च होण्याची भीती नाही.
त्यांचे लेखन विनोदी असले तरी त्याला उपहासाची झालर असायची. “आम्हाला मरायला काय झाले?’ या नाटकात बिहारमधील दुष्काळात मेलेली माणसे स्वर्गात जातात. त्यावेळी भाववाढ, म्हातारपण, क्षयरोग, कॉलरा, विंचूदंश, श्वानदंश अशा कारणांनी आपण मेल्याचं सांगतात. “मरताना तुम्हाला भूक लागली होती का?’ या प्रश्नाचे उत्तर एकजण देतो, “ते काय विचारता? सपाटून लागली होती! रेशनकार्डसुद्धा खाऊन टाकलं!’ त्यांनी विनोदी लघुत्तम कथा लिहिल्या. त्यात काही विज्ञानकथाही आहेत.
त्यांच्या विनोदी विज्ञान कथेतील एका प्रसंगात ते लिहितात, मंगळावरील एक शास्त्रज्ञ म्हणाला, “नारोपंत, गेल्या काही दिवसांपूर्वी आम्हाला पृथ्वीवर काळे डाग दिसून आले. काही भयंकर घडामोडी झाल्या काय तिकडे?’ यावर नारोपंत हसून म्हणाले, “छे छे! घाबरण्याचे कारण नाही. तशा काही विशेष घटना घडल्या नाहीत पृथ्वीवर. अहमदाबादेत मोरारजींना काळी निशाणे दाखविण्यात आली.’
बांदेकरांनी विनोदी प्रतिभेतून अनेक तत्कालीन नेत्यांचे व वृत्तपत्र संपादकांचे विडंबन करणाऱ्या कविता केल्या. “लोकमान्य’चे संपादक पां.वा. गाडगीळ यांच्यावर बांदेकरांनी एक विडंबनात्मक बालगीत लिहिले होते. “पांडोबा, पांडोबा भागलास का? …शेटजीच्या डगल्याखाली लपलास का? …शेटजी डगला गुजराती …मंत्र्यांचा वाडा चिकणमाती …मंत्र्यांचा वाडा पाहून जा …तूपरोटी खाऊन जा …तुपात पडला “मामा’ …पांडोबा देई राजीनामा …पण दुसऱ्या दिवशी जाई कामा! 3 ऑक्टोबर 1959 रोजी त्यांचे निधन झाले.