पुणे – जिल्ह्यात भीमा खोऱ्यातील 24 पैकी 18 धरणे पूर्णक्षमतेने भरली आहेत. त्यातून विसर्गही सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असून उजनीत 45 टक्के म्हणजे 87 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. यंदा जून आणि बहुतांश जुलैदेखील कोरडा गेला. दरवर्षी ऑगस्टमध्ये सर्वच धरणे 100 टक्के भरतात.
यंदा मात्र ऑगस्टमध्येही पावसाने विश्रांती घेतली. तर सप्टेंबरच्या दोन आठवड्यांत पाऊस पडलाच नाही. सलग 30 ते 45 दिवस पावसाचा खंड पडला. मात्र, मागील आठवड्यापासून धरण परिसरात पुन्हा पावसाचे आगमन झाले. चांगला पाऊस झाल्याने जवळपास 18 धरणांच्या पातळीत वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील उर्वरित सहा धरणांमध्ये 66 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहेत. पुढील काही दिवस पाऊस झाला, तर चार धरणे लवकर भरतील, असा अंदाज आहे. यंदा उजनी धरणात ऑगस्टपर्यंत मृतसाठा शिल्लक होता. जिल्ह्यातील 18 धरणांतून एकूण 23 हजार 684 क्युसेक इतका विसर्ग सुरू असून, हे पाणी उजनी धरणात जमा होत आहे.
धरण पाणीसाठा (टक्के)
येडगाव 100
वडज 100
डिंभे 100
घोड 100
कळमोडी 100
चासकमान 100
भामा आसखेड 100
वडीवळे 100
आंद्रा 100
पवना 100
कासारसाई 100
मुळशी 98.91
टेमघर 79.62
वरसगाव 100
पानशेत 100
खडकवासला 100
गुंजवणी 96.98
निरा देवधर 99.78
भाटघर 98.82