शिवाजी गाडे
डिंभे – एकेकाळी उजाड माळरान असलेला आंबेगाव तालुक्याच्या सर्व गावामध्ये पाणी नेऊन गावांचा आर्थिक स्तर उंचावत तालुक्याचे नंदनवन करण्यात महत्वाचा वाटा असलेले (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) डिंभे धरण प्रल्पासाठी आपल्या वडिलोपार्जित जमिनी देऊन तालुकाच्याच नव्हे; तर संपूर्ण राज्याच्या उन्नतीसाठी त्याग करणाऱ्या डिंभे धरणग्रस्तांची आजही आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी फरपट सुरू आहे.
आंबेगाव तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली असता डोंगरी आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये 300 इंचापेक्षा जास्त पाऊस, तर नदीकाठची गावे वगळता खडकाळ जिरायती जमीन पहायला मिळते. येथील शेतकऱ्याकडे शेतीचे क्षेत्रही कमी असल्याने पावसावर निर्माण होणारे तुटपुंजे उत्पन्न अशीच काही स्थिती काही वर्षापूर्वी होती. आदिवासी भागामध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहता शासकीय पातळीवर या आदिवासी पट्ट्यामध्ये धरण निर्मितीची संकल्पना उदयास आली.
1972 मध्ये डिंभे परिसरात धरण बांधण्याचे निश्चित करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होऊन धरण निर्मिती सुरू झाली तब्बल 36 वर्षानंतर हे धरण पूर्णत्त्वास आले. या धरणामुळे आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यातील एकूण 46 गावांतील 14129.25 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यामुळे या तालुक्यातील गावांमधील अल्पभूधारक शेतकरी योग्य नियोजन करून जास्तीजास्त उत्पादन मिळवू लागला. तसेच शेतीला जोड व्यवसाय कुकुट पालन शेळी पालन दुग्ध व्यवसाय आदी व्यवसाय ते करू लागले. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला. उत्पादनात वाढ झाली. बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या.
एकीकडे डिंभे धरणामुळे तालुकायाचा आलेख उंचावला असला तरी दुसरीकडे एकेकाळी आर्थिकदृष्ट्य्ा संपन्न असलेल्या डिंभे धरणात बुडीत क्षेत्रात येणाऱ्या भूमिपुत्रांची मात्र फरपट सुरु झाली आहे. आजही अनेक जण आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी पडेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
डिंभे धरणामुळे 24 गावे बाधित झाली असून यात आंबेगाव, कळंबई, फुलवडे, कोलतावडे, मेघोली, वचपे, दिगद, पंचाळे बुद्रुक, सावरली, कुशिरे, महाळूंगे तर्फे आंबेगाव ही 11 गावे पूर्णतः पाण्याखाली गेली. तर बोरघर, पाटण, कुशिरे बुद्रुक, पिंपरी, जांभोरी, फलोदे, आमडे, बेंढारवाडी, नानवडे, डिंभे बुद्रुक, पांचाळे बुद्रुक, आडिवरे ही 13गावे अंशतः पाण्याखाली गेली. या एकूण 24 गावांतील 1254 बाधित खातेदारांकडून 36 खातेदार पुनर्वसनासाठी अपात्र ठरले आहेत तर 64 खातेदारंकडून 65टक्के रकम मुदतीत न भरल्याने हे खातेदार अपात्र ठरले आहेत 1218 खातेदार पुनर्वसनास पात्र ठरले आहेत.
228भ ूमिहीन शेतमजुरांचा यात समावेश असून सर्व बाधित खातेदाराचे 1632 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले. या प्रकल्पांतर्गत बाधित असलेल्या खातेदारांचे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, कळंब, खडकी, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, लाखणगंव तसेच पारनेर तालुक्यातील जवळे, म्हशे निघोज कोहकडी या ठिकाणी प्रल्कप ग्रस्तानचे भूखंड वाटप करण्यात आले होते. डिंभे धरण प्रकल्पामुळे आंबेगावसह नगर जिल्ह्याला शेतीला पाणी मिळू लागले. हा भाग बागायती झाला पण धरण ग्रस्तांचे काय. अजूनही हेलपाटे मारूनही भूखंड मिळाले नाही प्रत्यक्ष त्रास होत असल्याचे दिसून येते.
धरणाच्या कामासाठी लागणारा दगड तसेच डबर यासाठी आमची 5 हेक्टर जमीन हस्तांतरीत केली. त्याचा मोबदला आम्हाला फक्त 15 हजार दिले. यात आम्हाला आमच्या कुंटूबातील एक व्यक्ती सरकारी नोकरीत रुजू करणेसाठी पुर्नवसन दाखलाही मिळाला नाही. दगडखानी साठी घेतलेली जमीन बदल्यात कुठेही जमीन मिळाली नाही वारंवार पुनर्वसन खात्याकडे पाठपुरावा करूनही आजतागात आमची दखल कोणीच घेतली नाही.
-जर्नादन गेंगजे, स्थानिक
वारंवार सरकारी दप्तरी जाऊन पुनवर्सन शाखेकडे हेलपाटे मारून आम्हाला फक्त आशेचे डोहाळे लावून देतात. यासाठी शासनाने आम्हाला भिकेला लावून आमची मायभूमी घेऊनही फक्त हेलपाटे सोडून काहीच दिले नाही. जमीनही गेली; मात्र मोबदलला काहीच मिळाला नाही.
-कमलाबाई गेंगजे, स्थानिक