बेकारी बऱ्याच प्रमाणात हटविणार
नवी दिल्ली, दि. 3 – देशातील बेकारी बऱ्याच प्रमाणात कमी करण्याची योजना आखण्याचे उद्दिष्ट 6व्या योजनेत गाठू व उरलेली बेकारी पुढील 5 वर्षांत हटवू, असे नियोजन मंडळाने ठरविले आहे. या योजनेचे स्वरूप पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी विशद केले. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी व शिक्षण मिळवण्यासाठी व्यवस्था केली जाईल. 7व्या योजनेअखेर देशात बेकारी शिल्लक राहणार नाही, असे उपाध्यक्ष प्रो. लकडावाला यांनी सांगितले.
विधानसभेइतकेच पंचायतराजलाही महत्त्व
पुणे – देशातील गरिबी व अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत देशातले सर्वच लोक स्वतंत्र झाले असे म्हणता येणार नाही. 70 टक्के लोक गरिबी-अज्ञानाच्या अंधकारातच आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने लोकशाही स्वातंत्र्य स्थापन होण्यासाठी लोकसभा-विधानसभा-महापालिका यांच्याबरोबर पंचायतराजचीही गरज आहे, असे विचार महाराष्ट्राचे राज्यपाल सादिक अली यांनी व्यक्त केले. पंचवार्षिक योजनेत मोठी गुंतवणूक झाल्याचेही ते म्हणाले.