वडगाव कांदळी परिसरातील शेतकरी हतबल; आजपासून पंचनामे
बेल्हे – गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस झाल्याने या पावसाने नगदवाडी, वडगाव कांदळी, कांदळी, साळवाडी (ता. जुन्नर) या परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, सोमवार (दि. 18) पासून पंचनामा करण्याचे आदेश कृषी विभागाकडून देण्यात आले आहे.
भाजीपाला पिकात पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेली पिके पूर्णपणे वाया गेलेली आहेत. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबला असून पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने फ्लॉवर, कोबी, भेंडी, काकडी, मिरची, वांगी, टोमॅटो या भाजीपाला पिकांबरोबरच झेंडू, चारा पिके व सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकांचे संगोपन केले आहे; परंतु सततच्या संततधार पावसाने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा भांडवली खर्चही वसूल होणार नाही. कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे अशी मागणी वडगाव कांदळी, नगदवाडी, येडगाव, साळवाडी , कांदळी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
वडगाव कांदळीत पावसाने शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकाबरोबरच चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी पूर्ण झाली असून संपूर्ण सोयाबीन वाया जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तरी कृषी विभाग, महसूल विभागाने नुकसानग्रस्त पिकांची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्याची गरज आहे.
– रामदास पवार, सरपंच, वडगाव कांदळी
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामा करण्याचे लेखी आदेश प्राप्त झाले असून सोमवारपासून पंचनामे केले जातील
– मालती गायकवाड, कृषी सहायक
सोयाबीनला मोठा फटका
जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीक घेण्याचा शेतकऱ्यांचा कल वाढला आहे .खरीप हंगामातील सोयाबीनची पेरणी नुकतीच पूर्ण झाली असून त्यानंतर पडणाऱ्या संततधार पावसाने अनेक शेतात पाणी साचले असून कोवळे सोयाबीन खराब होत आहे. सोयाबीन पिकास मशागतीचा एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो या पावसामुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे खराब होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
भाजीपाला पिकांचे नुकसान
भाजीपाला पिकांना गेली दोन महिने संगोपन करून पिके काढणीला येण्याच्या कालावधीतच जोरदार पाऊस सुरू असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. भांडवली खर्च कसा वसूल होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांच्या मुळ्या कुजु लागल्या आहेत.
…शेतकरी दुहेरी संकटात
सोयाबीन पीक पूर्णपणे खराब झाली असून चारा पिके पावसाने आडवी झाल्याने खराब झाली आहेत. पिके खराब झाल्याने शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. भाजीपाला पिकाबरोबरच चारा पिकांचाही पंचनामा करून नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे.