भिगवण – दीडशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर 1947 साली भारत देशास स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा निरक्षरता, गरीबी असे अनेक प्रश्न देशासमोर होते. त्यामुळे स्वातंत्र्य टिकविणे व लोकशाही रुजविणे हे खर्या अर्थाने देशासमोर आव्हान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या व भारतीय संविधानामुळे भारत देशामध्ये लोकशाहीचा पाया मजबूत झाला, असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
येथील बौद्ध विहारामध्ये रिपाइं व अमर बौद्ध युवक संघटनेच्या वतीने संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पुणे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार होते. पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पराग जाधव, संजय देहाडे, प्रा. तुषार क्षीरसागर, तानाजी वायसे, जावेद शेख, दादासाहेब थोरात, बाळासाहेब शेलार, रोहित शेलार, सत्यवान भोसले, प्रशांत वाघ, अमर धवडे, गुराप्पा पवार, अमर बौध्द युवक संघनटेचे अध्यक्ष अमोल कांबळे उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर राज्यघटनेमुळे देशामध्ये समता प्रस्थापित होण्यास मदत झाली. देशातील श्रीमंत व्यक्तीला एक मत व सर्वसामान्य व्यक्तींलाही एकच मत हे भारतीय राज्यघटनेचे यश आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने केवळ उद्देशिकेचे वाचन न करता संपूर्ण संविधानचा अभ्यास तरुण पिढीने केला पाहिजे. यावेळी देवानंद शेलार यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. प्रास्ताविक अमोल कांबळे यांनी केले तर विक्रम शेलार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन संघर्ष धेंडे, पप्पु लोंढे, अजय शेलार, प्रेम भोसले किरण कांबळे व पदाधिकार्यांनी केले. कार्यक्रमासाठी भिगवण व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
बौद्ध विहारासाठी आवश्यक निधी देऊ
भिगवण येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेला बौद्ध विहारामध्ये केवळ भिगवण येथीलच नव्हे; तर परिसरातील लोक धार्मिक व सामाजिक कार्यासाठी येतात. या ठिकाणी आणखी सुविधांची आवश्यक आहे. शासकिय पातळीवर प्रयत्न करुन येथील बौध्द विहाराच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू.