सासवड – परीक्षेत दुष्काळी भागातील विद्यार्थी आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी अभ्यास केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. राज्य लोकसेवा आयोग अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. जे विद्यार्थी मेहनत घेतात त्या विद्यार्थ्यांना यश नक्कीच मिळते. कोणतीही स्पर्धा परीक्षा असो विद्यार्थी सहभागी झाल्यास त्यांचे व्यक्तिमत्व घडते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल-कोलते यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रश्मी बागल-कोलते बोलत होत्या. यावेळी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, भारती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष भाऊसाहेब कड, साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष प्रकाश खाडे, प्रतिष्ठानच्या विश्वस्त शशिकला कोलते, दिलीप निरगुडे, रामचंद्र खेडेकर, माऊली मेमाणे, कुंडलिक मेमाणे, वसंत ताकवले, अश्पाक बागवान, संदीप टिळेकर आदी उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्रामध्ये यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यामुळे क्रिकेटपटू श्रद्धा मंदार गिरमे व आईस स्पीड स्केटिंगमध्ये यश मिळवल्याबद्दल स्वरूपा कड हिचाही सत्कार करण्यात आला. वास्तू विशारद परीक्षा पूर्ण केल्याबद्दल तेजश्री संकपाळ, श्रद्धा लोखंडे व ओमकार निगडे यांचे शाल, गुलाबपुष्प व कऱ्हेचे पाणी संक्षिप्त पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले.
यांचा केला सत्कार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपअधिक्षक म्हणून उत्तीर्ण झालेले मयूर यादव, रामानंद कळसकर, पोलीस उपनिरीक्षक म्हणून उत्तीर्ण झालेले यशराज पोमण, सरिता ताम्हाणे, रोहित जाधव, दिनेश धसाडे, जलसंपदा सहायक अभियंता हर्षली खंदारे, मंडल कृषी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल अंकुर काकडे, मनीषा खेडेकर, सनदी लेखापाल मोहिनी गायकवाड, किशोर काळे, भूषण यादव, अश्विनी शिंदे, सीमा नाझीरकर, उदयसिंह बाबर यांचे सत्कार करण्यात आले.